गुहागर दि. ४ (रामदास धो. गमरे) वस्तू आणि सेवा ह्यांच्या देवघेवीत वस्तूची व सेवेची किंमत काही काळानंतर चुकती करण्याची ऋणकोला धनकोकडून मिळणारी कर्जाऊ रक्कमेची सवलत म्हणजेच “पत (क्रेडिट – Credit)” व अशी पत देणारी स्थानिक लोकांद्वारे स्थानिक लोकांसाठी चालविण्यात येणारी संस्था म्हणजेच पतसंस्था (क्रेडीट सोसायटी – Credit Society) अश्या प्रकारची पतसंस्था आपल्या गुहागर तालुक्यामध्ये असावी या उद्देशाने अथक परिश्रम घेऊन प्रवर्तक काशिनाथ चांगु जाधव आणि सहकाऱ्यांनी प्रथमच बौद्धांसाठी बौद्धजन मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. गुहागर या पतसंस्थेची स्थापना मु. पो. जानवळे ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी येथे केली असून गुहागर तालुक्याच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत बौद्धजन मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, गुहागर यांच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. सदर पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सर्व संचालकांची बिनविरोध निवड होऊन संस्थेने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. पतसंस्थेच्या कार्यक्षेत्रातील सभासदांनी एकजूट दाखवत विकासाला प्राधान्य देत कोणत्याही विरोधी उमेदवाराने अर्ज न भरल्याने निवड निर्विवाद ठरली.






सदर प्रसंगी निबंधक अधिकारी कुमार देवरूखकर व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकृत घोषणा करताच वातावरणात उत्साहाचे वातावरण पसरले. नव्याने निवडून आलेल्या संचालकांनी सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेच्या अध्यक्षपदी काशिराम जाधव, उपाध्यक्षपदी सुनिल जाधव, यांची निवड झाली असून संचालक मंडळात विश्वनाथ कदम, संजय तांबे, दिपक मोहिते, शैलेंद्र पवार, रुपेश सावंत, मनिषा जाधव, साक्षी जाधव यांचा समावेश असून सदर संचाकल मंडळ सन २०२५-२६ ते सन २०३०-३१ या पाच वर्षांच्या कालावधीकरता राहील. त्याचप्रमाणे संचालक मंडळाने तज्ञ संचालक म्हणून संजय पवार व शांतिदुत जाधव यांची निवड घोषणा करून त्यास मान्यता दिली.
निबंधक अधिकारी कुमार देवरुखकर यांनी निवडणूक आलेल्या संचालक मंडळास शुभेच्छा देताना “गुहागर तालुक्यातील आपल्या पतपेढीच काम उत्तमरित्या सुरू आहे भविष्यात याचा विस्तार वाढणार असून अनेक शाखा निघतील अशी मला खात्री वाटते म्हणून आपण ठेवींवर भर देवून पारदर्शक पध्दतीने काम करा” अशी सूचना करीत शुभेच्छा दिल्या.
नवीन संचालक मंडळाने संस्थेच्या संस्थेच्या कारभारात पारदर्शकता व आर्थिक शिस्तीवर भर देत कर्जवाटप प्रक्रिया सुलभ करणे, महिला व युवकांसाठी विशेष कर्ज योजना राबविणे, तसेच डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे अशा विकासाभिमुख उपक्रमांची घोषणा केली, यामुळे ग्रामीण पातळीवरील आर्थिक व्यवहार अधिक सुकर, सुरक्षित आणि आधुनिक स्वरूपात येण्याची अपेक्षा आहे.
संस्थेच्या बिनविरोध निवडीमुळे सभासदांमध्ये परस्पर सलोखा व सहकार्याची भावना दृढ झाली असून येणाऱ्या काळात संस्थेची आर्थिक ताकद वाढून विकासाचा मार्ग अधिक भक्कम होईल व संस्थेच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.













