पुढील 24 तासांत ‘या’ राज्यांत धडकणार मान्सून; महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज उकाड्यापासून मिळणार सुटका! 

0

देशभरात उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय हवामान विभागाने ( IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील सहा ते सात दिवस केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच दक्षिण भारतातील अनेक भागांत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पावसाचा तडाखा बसू शकतो.

मान्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल

३ जूनपर्यंत नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरी सीमा कायम असून, येत्या २४ तासांत मान्सून नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राचा आणखी काही भाग, तसेच पश्चिम-मध्य, पूर्व-मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये पुढे सरकण्यासाठी वातावरण अनुकूल असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

अधिक वाचा  पंजाबमध्ये भाजपचा दणदणीत पराभव! ‘आप’चा 900 जागांवर विजय, काँग्रेस ही दुसरे स्थान मिळवत समाधानी?

राज्यातही पावसाची शक्यता

दरम्यान, वातावरणाच्या खालच्या थरात समुद्रसपाटीपासून सुमारे दीड किलोमीटर उंचीवर पश्चिम उत्तर प्रदेश आणि लगतच्या भागांवरील चक्रीय स्थितीपासून विदर्भ मार्गे उत्तर तामिळनाडूपर्यंत एक द्रोणीय रेषा सक्रिय आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. ३ जून रोजी कोकण-गोव्यात अनेक ठिकाणी, तर राज्याच्या इतर भागांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ४ जून रोजी कोकण, गोवा आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज असून, राज्यातील इतर भागांतही हलक्या सरी कोसळू शकतात.

तापमानात घट होणार

पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील बहुतांश भागांत तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसपर्यंत घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, विदर्भातील काही भागांत तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले आहे.

अधिक वाचा  ‘सुपर एल निनो’मुळे पाऊस लांबणार; उजनीतील पाणी पिण्यासाठी राखीव;  धरण उणे २१ टक्के, पाण्याचा निर्णय राज्य शासनाच्या हाती

विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

दरम्यान, जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ४ जून रोजी वर्धा जिल्ह्यासाठी, तर ५ जून रोजी भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे तसेच जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याच्या काळात आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.