विधान परिषदेसाठी मविआ व महायुती जागावाटप फाइनल पण राज्यात वेगळेच ‘डावपेच ‘; बाहुबली पक्षाच्या विरोधात राज्यभर वेगळ्या समीकरणाची जुळवणी? पक्षीय बलाबल सविस्तर वाचा

0

महाराष्ट्र राज्यातील बहुप्रतिक्षित २०२६ च्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी मविआ व महायुती यांनी आपल्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. महायुतीकडून सर्वाधिक जागा लढत भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत विरोधकांना 17 -0 असा धोबीपछाड देण्याचा संकल्प केला असला तरी सुद्धा महाविकास आघाडीच्या वतीने मात्र किमान 4 ते 5 ठिकाणी विजय साजरा करण्यासाठी रणनीती आखली जात आहे. भाजप ‘पैसे उधळून मौजमजा करण्याचे’ राजकारण करत असून नगरसेवकांना आपल्या बाजूने आकर्षित करत आहे. त्यांनी भाजपवर मतचोरी आणि निवडणुका जिंकण्यासाठी पैशाच्या शक्तीचा अत्याधिक गैरवापर केल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी आरोप केल्याने २०२६ च्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी नवीन सत्ता संतुलन हे राज्य राजकारणातील एका मोठ्या उलथापालथीचे संकेत देत आहेत. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १ जून २०२६ आहे. १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल आणि २२ जून रोजी निकाल जाहीर केला जाईल.

जूनमध्ये होणाऱ्या या निवडणुका आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आघाडीची एकता आणि भाजपविरोधी आघाडीच्या ताकदीची खरी कसोटीही ठरतील. यावेळी महा विकास आघाडीचा उद्देश या महत्त्वाच्या जागांवर एकजूट होऊन आपले स्थान मजबूत करणे हा आहे. काँग्रेस ८ जागांसह आघाडीत पुन्हा केंद्रस्थानी आली आहे आणि उद्धव ठाकरे यांनी ६ जागांसह आपली पकड कायम ठेवली आहे, तर शरद पवार गटाला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या जागावाटपावरून हे स्पष्टपणे दिसून येते की, महाविकास आघाडीमधील मोठ्या भावाची भूमिका आता केवळ काँग्रेस आणि ठाकरे गटांपुरतीच मर्यादित झाली आहे. दोन जागांबाबत अद्याप चर्चा सुरू आहे. येणाऱ्या दोन दिवसांत या राहिलेल्या दोन जागांबाबत देखील अंतिम निर्णय होईल. नांदेड आणि नाशिकच्या जागेबाबत आमच्या तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. त्यामुळे या दोन्ही जागा वगळता इतर १५ जागांबाबत निर्णय जाहीर केला आहे.

लोकशाहीमध्ये निवडणुका लढवणे महत्त्वाचे मविआत परस्परविरोधी मत

महाविकास आघाडीचे जागावाटप होत असताना काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) नेत्यांच्या मतांमध्ये मात्र विसंगती दिसून आले. शिवसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघात अनेक ठिकाणी आमच्याकडे खूपच कमी मतदान आहे. त्यामुळे या जागांमध्ये लक्ष कशाला घालायचे याबाबत आमची चर्चा झाली. काँग्रेसला सर्वाधिक जागा लढवू द्या, त्यांना निवडणूक लढविण्याची खुमखुमी आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. याला उत्तर देताना सपकाळ यांनी संख्याबळ हे आपल्याजागी असल्याचे सांगताना लोकशाहीमध्ये निवडणुका लढवणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले. निवडणुका जिंकणे हा वेगळा भाग आहे आणि आपल्या मूल्यांकरिता आणि विचारांकरिता लढणे हा वेगळा भाग आहे. महाविकास आघाडीची संघर्षाची भूमिका असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपकडून घोडेबाजार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

महायुतीमधील तेढ निर्माण होण्याचे कारण- 

पुण्यात एकटा पक्ष म्हणून राष्ट्रवादी मोठा दिसत असला, तरी भाजप-शिवसेनेकडे पुण्यात राष्ट्रवादीहून अधिक मते आहेत. पुण्यात भाजप व शिवसेना एकत्रित, तर राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्यामुळे पुण्यावर भाजपने दावा केला आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेकडे अधिक मत असूनही हा मतदारसंघ अनिकेत तटकरेंसाठी राष्ट्रवादीकडून मागितला जात आहे.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या बदल्यात शिवसेनेकडून राष्ट्रवादीकडे परभणी-हिंगोली जागेची मागणी केली जात आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आकडेवारी पाहिली असता राष्ट्रवादीच्या वाट्याला एक, शिवसेनेच्या वाट्याला एक व 15 जागा हा भाजपच्या वाटेला येणे अपेक्षित आहे. मात्र राज्यात मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेला व शिवसेनेसोबत युतीत लढल्यामुळे भाजपने शिवसेनेला एका ऐवजी 4 जागांची ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

महायुती कुणाला कुठल्या जागी संधी ?

  • भाजप –नाशिक, वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली, अमरावती, नागपूर, सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ- वाशिम, भंडारा- गोंदिया
  • राष्ट्रवादी काँग्रेस – पुणे, कोकण
  • शिवसेना – ठाणे, परभणी- हिंगोली, यवतमाळ- वाशिम, छत्रपती संभाजीनगर- जालना

माविआ कोणत्या पक्षाला कोणती जागा?

  • काँग्रेस :चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-बीड-लातूर आणि नागपूर (पोटनिवडणूक)
  • शिवसेना (ठाकरे): रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर
  • राष्ट्रवादी (शरद पवार ) : पुणे, ठाणे, सातारा-सांगली
अधिक वाचा  पुणे महापालिका अधिकार वाटपाच्या गोंधळात पुणेकरांना खड्ड्यांचा साम्राज्य; ६८ हजार मीटर रस्ते खोदले, दुरुस्तीला बगल

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत १७ पैकी नाशिक आणि नांदेड वगळता १५ जागांवर महाविकास आघाडीत सहमती झाली आहे. काँग्रेस सर्वाधिक ८, शिवसेना (ठाकरे) ४ तर राष्ट्रवादी (शरद पवार) ३ जागांवर निवडणूक लढणार आहे.नाशिक आणि नांदेड या जागांचा तिढा या बैठकीत सुटला नसला तरी नांदेडच्या जागेवर काँग्रेस तर नाशिकच्या जागेवर शिवसेना (ठाकरे) लढण्याची शक्यता आहे.

विधान परिषद १७ जागांवर सध्या विराजमान आमदारांची यादी व पक्षीय बलाबल –

सोलापूर : प्रशांत परिचारक (भाजप)

या विधान परिषदेमध्ये भाजप – काँग्रेस अशी थेट लढत होणार असली तरी सुद्धा सोलापूर मतदार संघातील शिवसेना – ७६ व राष्ट्रवादी – ४८ ची किती मते भारतीय जनता पक्षाला जातील यावरच लढतीचे भवितव्य अवलंबून आहे. सोलापूर मतदार संघात एकूण मते ६१७ असून महायुतीकडे भाजप – ३०४, शिवसेना – ७६, राष्ट्रवादी – ४८ असे भक्कम प्राबल्य निर्माण आहे.

अहिल्यानगर : कै. अरुणकाका जगताप (राष्ट्रवादी)

भाजप – काँग्रेस अशी थेट लढत अहिल्यानगर मतदार संघामध्ये होणार असली तरी सुद्धा आयात उमेदवारीमुळे या मतदारसंघातील लढतीकडे लक्ष लागले आहे. अहिल्यानगरमध्ये एकूण मते – ४५२ असून भाजप – २०७, शिवसेना – ४४, राष्ट्रवादी – ६४ अशी लढत असली तरी सुद्धा नाराज भारतीय जनता पक्षातील पदाधिकारी व मित्र पक्षातील संबंधावर या मतदारसंघांमध्ये काही निर्णायक मते फुटण्याची भीती आहे.

ठाणे : रवींद्र फाटक (शिवसेना)

ठाणे विधान परिषद मतदार संघामध्ये शिवसेना – शरद पवार यांचा पक्ष परस्पर विरोधात लढण्याची शक्यता निर्माण झाली असून मित्रपक्ष भाजपाकडे सर्वाधिक मतदार असताना या मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या पदरामध्ये किती मते पडतात यावरती या विधान परिषद निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. मतदारसंघांमध्ये महायुतीतील मित्र पक्ष असलेले भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच प्राबल्य असून यातील सर्वची सर्व मते महायुतीच्या उमेदवाराला मिळतात का यावरच महायुतीतील सलोखा लक्षात येणार आहे.

ठाणे मतदारसंघांमध्ये एकूण मते – ९९७ असून भाजप – ४३१, शिवसेना – ३०९, राष्ट्रवादी – १८ असल्याने या मतदारसंघांमध्ये एकतर्फी महायुतीचा विजय होणार असला तरीही आयात उमेदवारी मतांमध्ये फेरबदल करू शकते.

जळगाव : चंदूभाई पटेल (भाजप)

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित जागेपैकी जळगावची जागा ही शिवसेना व भारतीय जनता पक्ष यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. राज्यातील शिवसेना कॅबिनेट मंत्री आपल्या मुलासाठी या जागेवर चाचपणी करत असतानाच भाजपने या जागेवर दावा केल्याने सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच जळगाव महाविकास आघाडी कडून ठाकरे गट लढत असल्याने शिवसैनिक मतदारांमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जळगाव मतदार संघामध्ये एकूण मते – ६६७ असून, भाजप – २७४, शिवसेना – २०८ व राष्ट्रवादी – ५५ ची एकत्र नोटबंदी केल्यास एकतर्फी विजय वाटत असला तरी सुद्धा अंतर्गत संघर्षातून ठाकरे गटाच्या उमेदवाराला अपेक्षा जास्त मते मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीतील ऐक्य सध्या या मतदारसंघांमध्ये पणाला लागले असून आगामी काळातील सत्ता संघर्ष या मतदारसंघातील मतदानावरून लक्षात येणार आहे.

सांगली-सातारा : मोहनराव कदम (काँग्रेस)

एकेकाळी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य निर्माण झालेले असताना या मतदारसंघातील लढत महाराष्ट्रातील आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या मतदारसंघांमध्ये महायुतीतील भाजपा व मित्रपक्ष यांचे टोकाचे संघर्ष सुरू असून शिवसेना भाजपा एकमेकांच्या विरोधात थेट मैदानात उतरलेल्या आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या विरोधात शरद पवार यांचा पक्ष सांगली-सातारा मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे; शरद पवार यांचे संबंध आणि मतदारसंघातील टोकाचा संघर्ष यावर या मतदारसंघातील राजकीय गणित अवलंबून आहे. सांगली सातारा मतदारसंघात एकूण मते – ८९८ असून सत्ताधारी माहितीकडे भाजप – ३७१, शिवसेना – ११०, राष्ट्रवादी – १४५ असले तरीही सुमारे 250 मतदारांची नाराजी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान करते की वेगळा मार्ग अवलंब करेल यावर या मतदारसंघातील निकालाचे भवितव्य आहे.

अधिक वाचा  सुतारदरा वीज समस्या सुटणार; नगरसेविका मनिषा बुटालांच्या प्रयत्नामुळे ३१५ केव्हीएचा नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित होणार ना. चंद्रकांतदादांचे हे निर्देश

नांदेड : अमर राजूरकर (काँग्रेस)

काँग्रेस पक्षाचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या नांदेड मतदार संघामध्ये सध्या ठाकरे गट काँग्रेस असा दावा जोर धरत असून यामध्ये कदाचित काँग्रेस पक्षाला यश मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. नांदेड आणि नाशिक मित्रपक्ष आपापसात समझोता होण्याची शक्यता आहे. या जागा मिळाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि काँग्रेसमध्ये आयुष्य व्यथित केलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी या मतदारसंघांमध्ये विजय आवश्यक आहे. या मतदारसंघांमध्ये पारंपरिक विरोधक असलेला काँग्रेस जर समोर आला तर लढती आकर्षक होण्याची शक्यता आहे.

यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना)

मराठवाड्यातील आपल्या पक्षाचे प्राबल्य वाढवण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती प्रयत्न करत असल्याने या यवतमाळ मतदारसंघांमध्ये शिवसेना – काँग्रेस लढतीमध्ये महायुतीच्या उमेदवाराचे प्राबल्य जाणवत आहे. मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाकडे सुद्धा सर्वाधिक मतदान असल्याने पारंपारिक विरोधक असलेल्या काँग्रेसचा पराभव करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेला थेट मदत करण्याची शक्यता आहे.

यवतमाळ मतदारसंघात एकूण मते – ४४६ असून भाजप – १३५, शिवसेना – १०४, राष्ट्रवादी – २९ असे पक्षीय बलाबल असून यामध्ये सरळ लढतीमध्ये शिवसेनेचा विजय होण्याची शक्यता आहे.

पुणे : अनिल भोसले (राष्ट्रवादी)

पुणे विधान परिषद पवार कुटुंबीयांचे प्राबल्य असलेला मतदारसंघ शरद पवार आणि अजित पवार यांनी या मतदारसंघावर आपले प्राबल्य कायमच आबादीत ठेवले. राज्यातील बदलत्या समीकरणांनुसार वाढत्या प्राबलल्यामध्येही ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याकडे राखण्यात अजित पवार यांच्या गटाला यश मिळाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकमेव राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी ही लढत याच मतदारसंघांमध्ये पाहण्यास मिळणार आहे.

पुणे मतदार संघामध्ये एकूण मते – ८७८ असून भाजप – ३३५, शिवसेना – ८२, राष्ट्रवादी – ३७५ यांच्याकडे प्राबल्य असून या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार असल्याने निवडणूक ही फक्त प्रक्रिया असून सर्वात शांत मतदारसंघ म्हणून याकडे पाहिले जाईल.

भंडारा-गोंदिया : परिणय फुके (भाजप)

विदर्भातील आपली ताकद कायम ठेवण्यासाठी या मतदारसंघांमध्ये पारंपरिक विरोधक असलेली भारतीय जनता पक्ष व काँग्रेस ही लढत होणार आहे. महायुतीकडून भाजप भंडारा- गोंदिया मधील निवडणूक लढत असून उमेदवार कोण यावरती अजून शिक्कामोर्तब झाले नाही. कदाचित पुन्हा त्याच उमेदवाराला संधी मिळण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.भंडारा गोंदिया मतदार संघामध्ये एकूण मते – ४३६ असून भाजप – १९६, शिवसेना – १५, राष्ट्रवादी – ८३ एवढी प्राबलल्याची मते आहेत. या मतदारसंघांमध्ये शिवसेनेकडे जास्त मते नसली तरी सुद्धा प्रफुल्ल पटेल यांचे प्राबल्य असलेल्या भागांमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय सुखर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग: अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)

कोकण विभागातील एकमेव विधान परिषदेची जागा महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांकडे प्रतिष्ठेची बनलेली आहे. महायुतीकडून अत्यंत अटीतटीच्या या जागेवर उमेदवारी देण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळाले असले तरी सुद्धा या मतदारसंघांमध्ये तुल्यबळ लढत देण्यास ठाकरे गट मैदानात आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात एकूण मते – ८२३ असून भाजप – २४१, शिवसेना – २७५, राष्ट्रवादी – १४९ मित्रपक्षा असलेल्या अन्य पक्षांकडे सर्वाधिक मते असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय धोक्यात आला आहे.

नाशिक : नरेंद्र दराडे (शिवसेना)

या मतदारसंघांमध्ये महायुतीतील सर्वाधिक जागा मिळवलेल्या भाजपचे प्राबल्य असून या मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी रणनीती आखण्याचे काम सुरू आहे. ठाकरे गटाला नाशिकची जागा मिळाल्याने येथे विजय सुकर वाटत आहे. नाशिक मतदारसंघात एकूण मते – ६०३ असून भाजप – १८६, शिवसेना – १६१,राष्ट्रवादी – १०७ असे भक्कम प्राबल्य आहे.

अधिक वाचा  ज्याची भीती तेच घडतंय 10 दिवसांमध्ये आता चाैथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये थेट मोठी वाढ, तब्बल इतक्या रूपयांनी…

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली: रामदास आलोटकर (भाजप)

विदर्भातील पारंपारिक लढत म्हणून या मतदारसंघाकडे पाहिले जात असून भाजप –काँग्रेस आमने-सामने येण्याची शक्यता आहे. चंद्रपूर मतदार संघामध्ये आणि भाजपा यांच्यामध्ये थेट लढत होणारा असल्याने भारतीय जनता पक्षाचा विजय या ठिकाणी शुकर वाटत आहे. वर्धा चंद्रपूर गोंदिया- एकूण मते – २६४ असून भाजप – १४९, शिवसेना – १, राष्ट्रवादी – १५ मुळे या भागात लढतीची फक्त प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.

अमरावती: प्रवीण पोते (भाजप)

राज्यातील एकमेव मविआच्या ताब्यात जाणारी जागा म्हणून या जागेकडे पाहिले जाते. या जागी सत्ताधारी महायुतीचे प्राबल्य नसतानाही भाजप या मतदारसंघांमध्ये निवडणुकीला सामोरे जात आहे. तर एकमेव विजयी होण्याची शक्यता असलेली जागा आपल्या पदरामध्ये पाडण्यास काँग्रेसला यश आले आहे.

अमरावती मतदारसंघात एकूण मते – ४४९ असून भाजप – १३६, शिवसेना – २३, राष्ट्रवादी – ८३ एवढीच मते असल्याने या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

धाराशिव-लातूर-बीड : सुरेश धस (भाजप)

या मतदारसंघांमध्ये आपला विजय कायम राखण्यासाठी मित्र पक्षाला सोबतीला घेऊन भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. मराठवाड्यातील महत्त्वाचे तीन जिल्हे या मतदारसंघात असल्यामुळे काँग्रेस या निवडणुकीत उतरले असली तरी सुद्धा भाजपने मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जीवावर हा मतदारसंघ सर करण्याचा संकल्प केला आहे.

धाराशिव लातूर बीड मतदार संघात एकूण मते – ९०४ असून  भाजप – ३७९, शिवसेना – ८०, राष्ट्रवादी – २०२ असे प्राबल्य असले तरीसुद्धा काँग्रेसने या मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी गोळा बेरीज करण्याची सुरुवात केली आहे.

परभणी-हिंगोली : विप्लव बाजोरिया (शिवसेना)

या मतदारसंघांमध्ये आपली हक्काची जागा कायम ठेवण्यासाठी शिवसेना – शिवसेना ठाकरे गट एकमेकांच्या समोर लढत आहेत. या मतदारसंघांमध्ये शिवसेनेला अल्प मते असतानाही संधी देण्यात आली असती तरीसुद्धा मित्रपक्ष असलेल्या भाजप व सर्वाधिक मताधिक्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवर विजय अवलंबून आहे. परभणी हिंगोली मतदारसंघात एकूण मते – ४७३ असून भाजप – १११, शिवसेना – ७४, राष्ट्रवादी – १२३ असे महायुतीचे प्राबल्य आहे.

छत्रपती संभाजीनगर-जालना : अंबादास दानवे (शिवसेना)

मराठवाड्यातील अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला हा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन्ही शिवसेना आमने सामने येण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी नगर – जालना मतदार संघामध्ये एकूण मते – ६४६ असून भाजप – २५४, शिवसेना – १३९, राष्ट्रवादी – ८६ प्राबल्य असून प्रभावी मतं असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेवर या मतदारसंघातील विजय अवलंबून आहे. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या मतदार संघात पुन्हा शिवसेनेचाच आमदार निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)

विदर्भातील प्रमुख लढत म्हणून भाजप नागपूर मतदार संघामध्ये उतरली आहे. एकतर्फी असलेल्या या निवडणुकीमध्ये काँग्रेसने लढण्याचा निर्णय घेतल्याने रंगत निर्माण झाली आहे. नागपूर मतदार संघात एकूण मते – ७९४ असून भाजप – ५०१, शिवसेना – ३०, राष्ट्रवादी – ५ असे भक्कम प्राबल्य आहे.

काँग्रेसकडून निरीक्षक नियुक्ती

  1. सोलापूर – खासदार प्रणिती शिंदे,
  2. सांगली-सातारा – माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम,
  3. पुणे- गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील,
  4. अहिल्यानगर- ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात,
  5. जळगाव- खासदार चंद्रकांत हंडोरे,
  6. नाशिक – माजी मंत्री के. सी. पाडवी,
  7. नांदेड- खासदार रविंद्र चव्हाण,
  8. धाराशिव-लातूर-बीड- माजी मंत्री आमदार अमित देशमुख,
  9. परभणी हिंगोली- खासदार डॉ. कल्याण काळे,
  10. छत्रपती संभाजीनगर-जालना- माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील,
  11. यवतमाळ- माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे,
  12. भंडारा-गोंदिया- माजी प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले,
  13. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली- विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार,
  14. अमरावती- माजी मंत्री यशोमती ठाकूर,
  15. नागपूर – माजी मंत्री डॉ. नितीन राऊत,
  16. ठाणे – माजी मंत्री नसिम खान,
  17. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग- मुझफ्फर हुसेन यांना जबाबदारी देण्यात आली आहे.