राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधीमंडळाच्या परिसरात आले असताना त्यांनी केलेल्या विधानाची सध्या चर्चा होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांच्यासोबत बोलत असताना त्यांनी कुणालातरी उद्देशून हरामखोर आहेत ते असं म्हटलं. त्यांचा हा संवाद कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र ठाकरे नेमंक कुणाला असं म्हणाले हे स्पष्ट झालं नाहीय. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या विधानाही सध्या चर्चा होतेय.
विधीमंडळ परिसरात वरुण सरदेसाईंशी बोलताना उद्धव ठाकरेंनी हरामखोर आहेत ते असं विधान सत्ताधारी आमदारासाठी केल्याचं म्हटलं जातंय. मात्र ते नेमकं कोणाबद्दल बोलले माहिती नाही असं त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं. व्हिडीओ पाहिले असता दिसतं की सभागृहात काय घडलं आणि दिशा सालियान प्रकरणाबद्दल उद्धव ठाकरे वरुण सरदेसाईंशी चर्चा करत विधीमंडळात येत होते. त्यावेळी पायऱ्यांवरून चढण्याआधी हरामखोर आहेत ते असं उद्धव ठाकरे बोलताना दिसतात.
भाजप आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, विधानसभेत मी सुशांत सिंग राजपूतचा मुद्दा उपस्थित केला. ठाकरेंच्या कार्यकाळात पुरावे कशा प्रकारे नष्ट केले. रातोरात फर्निचर घाई गडबडीत काढले, रातोरात रंगरंगोटी केली. दारं, कुलपं बदलली गेली. बिहारचे पोलीस आले त्यांना अडवलं गेलं. जर ह्यांनी काही केलं नसेल तर चौकशी का करू दिली नाही.
बिहारवरून चौकशीसाठी आलेल्या पोलिसांशी गैरवर्तन केलं. ६८ दिवस हे सगळ्या गोष्टी करत होते. ६८ दिवसांनी पुरावे नष्ट करून सीबीआयकडे प्रकरण सोपवलं. आज हे सभागृहात मांडल्यानंतर दिशा सालियान प्रकरणी एसआयटी चौकशी सुरू असल्याचं सरकारने सांगितलं. जर त्यांनी कोणाला वाचवलं नसेल, काही केलं नसेल तर हा त्रागा, अपशब्द कुणासाठी आणि कशासाठी? पण महाराष्ट्राची जनता याचा अर्थ एवढाच काढेल की कोरोना काळात लोकं तडफडून मरत असताना हे सरकार सुशांतच्या घरातलं फर्निचर काढत होतं. रिया चक्रवर्तीच्या बाजूने उभा राहत होतं असे आरोप राम कदम यांनी केले.