विरोधी पक्षांच्या आमदारांनी जर उद्या शपथ घेतली नाही तर काय होणार? भुजबळांनीही सांगितले प्रक्रिया अन अडचणी

0
1

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुमारे दोन आठवड्यानंतर महायुती सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. आता आजपासून सुरू झालेल्या विशेष अधिवेशनात राज्यातील नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीला सुरुवात झाली आहे. दरम्यान ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांतील आमदारांनी, आमदारकीची शपथ न घेण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी आमदारांच्या या भूमिकेवर बोलताना छगन भुजबळ यांनी जर उद्याही या आमदारांनी शपथ नाही घेतली तर काय होईल याबाबत भाष्य केले आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

राष्ट्रवादीचे (अजित पवार) येवल्याचे आमदार छगन भुजबळ विरोधी आमदारांच्या शपथ न घेण्याच्या भूमिकेवर बोलताना म्हणाले की, “मी १९८५ पासून आमदार आहे. त्यामुळे यापूर्वी असे काही घडल्याचे मला आठवत नाही. या आमदारांना उद्या शपथ घ्यावीच लागेल. जर नाही घेतली तर विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीनंतर त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन या आमदारांना शपथ घ्यावी लागेल. या आमदारांना जर सभागृहाच्या कामकाजामध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यांना शपथ घ्यावीच लागेल.”

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

बेनामी संपत्ती प्रकरणातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न्यायालयाने क्लिन चीट दिली आहे. यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. याबाबात बोलताना भुजबळ म्हणाले की, सत्ता आणि याचा काही संबंध नाही. त्यांना न्यायालयाकडून क्लिन चीट मिळाली आहे.

विरोधी पक्षातील आमदारांचा शपथविधीवर बहिष्कार

ईव्हीएमचा मुद्दा आणि माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे घडलेल्या घटनेनंतर आज आमदारांच्या शपथविधीवर विरोधी पक्षांतील आमदारांनी बहिष्कार टाकत शपथ न घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी शिसेनेचे (उद्धव) आमदार अदित्य ठाकरे यांनी ते आज शपथ घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान आज दुपारपर्यंत झालेल्या आमदारांच्या शपथविधीमध्ये सत्ताधारी पक्षातीलच बहुतांश आमदारांनी शपथ घेतली आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

भगवे-गुलाबी फेटे ते संस्कृतमध्ये शपथ

आज आमदारांच्या शपथविधीसाठी भाजपाचे आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार भगव्या फेट्यांमध्ये तर राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार गुलाबी फेट्यांमध्ये आल्याचे पहायला मिळाले. यावेळी सत्ताधारी पक्षांतील काही आमदारांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली. काही आमदारांनी जय श्रीरामचे नारे दिले. तर, काही आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि आनंद दिघे यांच्या नावाचा उल्लेख केला.