यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचे अंतर ६ किमीने कमी होईल. या मार्गावर सुरुवातीच्या टप्प्यात केवळ हलकी वाहने, बसलाच प्राधान्य देण्यात येणार आहे.त्यामुळे घाटातील वाहतूककोंडी कमी होईल. या रस्त्यावर टोलवाढ होणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिली.






महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला पूर्णतः ‘ॲक्सेस कंट्रोल’ बनविणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाची उभारणी केली आहे. त्याची ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, दि. १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रवासी वाहतूक ‘मिसिंग लिंक’मुळे होईल. त्यामुळे नागरिकांचा त्रास कमी होईल, असेही त्यांनी नमूद केले. प्रकल्पामुळे मुंबई-पुणे अंतर तब्बल अर्ध्या तासाने कमी होणार आहे. प्रकल्पात तब्बल ८.९२ किमी लांबीचा बोगद्यात असून, यात एखादा अपघात घडून वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी सुरुवातीला अवजड वाहने आणि ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी असेल. त्यामुळे केवळ कार आणि बसलाच प्रवेश दिला जाणार आहे.
अपघाताचे प्रमाण येणार शून्यावर
नव्या मार्गामुळे घाटातील वळणे आणि वाहतूक पूर्णपणे ‘बायपास’ होणार आहे. त्यातून अपघात जवळपास शून्यावर येतील, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. राज्याच्या कोणत्याही कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात ७ ते ८ तासांत पोहोचता येईल, अशी व्यवस्था उभारत आहोत, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
पर्यटनस्थळांच्या विकासाला पंख
प्रकल्पातील बोगद्यांना गडकिल्ले आणि कार्ला लेण्याच्या प्रतिकृतीप्रमाणे सजवण्यात आले आहे. प्रकल्पामुळे पुण्याजवळील पर्यटनस्थळांना पोहोचणे सहज शक्य होणार असून लोहगड, विसापूर किल्ले आणि कार्ला लेणी यांसारख्या स्थळांना अधिक चांगली जोडणी मिळणार आहे.
केबल-स्टेड पूल ठरणार आकर्षण
प्रकल्पात १३.३ किमी लांबीच्या मार्गाची उभारणी केली असून, त्यासाठी सुमारे २३.७५ मीटर रुंदीचे जगातील सर्वांत रुंद दोन बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे १८२ मीटर उंचीचा केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. लोणावळा तलावाच्या १८२ मीटर खालून हा रस्ता जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करणे आव्हान होते, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.












