मुंबई : राज्यात लवकरच ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू होणार असून राज्य परिवहन विभागानं ई-बाईक टॅक्सीच्या भाड्याचे दर निश्चित केले आहेत. ई-बाईक टॅक्सीचे दर ठरवताना सामान्य लोकांच्या खिशाला परवडेल याची काळजी घेण्यात आली आहे. पहिल्या दीड किलोमीटरसाठी प्रवाशांना फक्त 15 रुपये आकारले जातील, तर त्यानंतर प्रत्येक अतिरिक्त किलोमीटरसाठी 10 रुपये 27 पैसे इतके भाडे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे स्वस्त, वेगवान आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे.






रॅपिडो, ओला आणि उबेरला परवानगी
सरकारने रॅपिडो, ओला, उबेर यांसारख्या मोठ्या अॅप-आधारित सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना ई-बाईक टॅक्सी चालवण्यास परवाना दिला आहे. याशिवाय आणखी एका नव्या संस्थेलाही ही परवानगी देण्यात आली आहे. याआधी अनधिकृत बाईक टॅक्सीवर कारवाई करण्यात येत होती. पण आता ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात आल्यानंतर आता भाड्याचे दरही निश्चित झाले आहेत.
भाडे असे असेल?
ई बाईक टॅक्सीसाठी पहिल्या दीड किमीसाठी 15 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. पुढे प्रत्येक किमीसाठी 10.27 रुपये दर आकारण्यात येईल.
ई-बाइक टॅक्सी धोरण काय?
महाराष्ट्र सरकारने ई-बाइक टॅक्सी सेवा सुरु करण्याचे धोरण मंजूर केले आहे. त्याला “महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, 2025” या नावाने मसुदा धोरण जारी करण्यात आले आहे.
या धोरणानुसार ई-बाइक टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्याकडे किमान 50 ई-बाइक असाव्यात.
चालकाची वयमर्यादा 20 ते 50 वर्षे आहे, त्याची पोलिस तपासणी आवश्यक आहे, ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे.
जीपीएस ट्रॅकिंग, आपत्कालीन संपर्क सुविधा असावी.
सुरक्षेसाठी GPS व इन्शुरन्स अनिवार्य करण्यात येणार आहे.
वाहनावर “बाइक टॅक्सी” हा शब्द स्पष्टपणे लिहिला गेलेला असावा. ही सेवा वाहतूक विभागाच्या परवान्यानेच चालवता येईल.
ई-बाइक टॅक्सी सेवा अपेक्षित फायदे
वाहतूक कमी होऊ शकेल: छोट्या दुचाकी वाहनांद्वारे सेवा दिल्यास ट्राफिकमध्ये होणारी गर्दी कमी होण्याची शक्यता आहे.
प्रत्येकाला सुविधा, खासकरून त्वरित प्रवासासाठी: अॅड-हॉक प्रवासासाठी टॅक्सी-बस किंवा ऑटो मिळायला वेळ लागतो. त्याठिकाणी ई-बाइक टॅक्सी लवकर पोहोचू शकतात.
पर्यावरणपूरक वाहतुकीचा वापर: इलेक्ट्रिक बाईक असल्यामुळे वायू प्रदूषण कमी होऊन शहरातील हवामान सुधारण्यास मदत होईल.
खर्चात बचत: इंधन खर्च कमी असल्याने प्रवाशांचे भाडेही तुलनेने कमी होऊ शकते.
रिक्षा-टॅक्सी-ऑटोला पर्याय: विशेषत: लहान रस्ते, गर्दीचे मार्ग यावर ऑटो किंवा टॅक्सी जास्त वेळ घेतात. त्या ठिकाणी ई-बाइक टॅक्सी उपयुक्त ठरू शकतात.
प्रवाशांना काय फायदे होतील?
वेगवान सेवा: ऑटो/टॅक्सीच्या तुलनेने ई-बाइक टॅक्सी पोहोचण्यास वेळ कमी लागेल.
कमीत कमी शुल्क: छोट्या अंतरावरील प्रवासासाठी कमी दरात सेवा मिळण्याची अपेक्षा आहे.
अॅप-आधारित बुकिंग व ट्रॅकिंग: प्रवाशांना त्यांच्या प्रवासाची माहिती, मार्ग, वेळेची माहिती अॅपवरून मिळू शकेल.
सुरक्षा: चालक तपासणी, आपत्कालीन संपर्क सुविधा, जीपीएस या सर्व गोष्टी असल्यामुळे अधिक सुरक्षित.
पर्यावरण-स्वच्छता: इंधनावर अवलंबित्व कमी होऊन प्रदूषण कमी होईल; शहरातील हवा स्वच्छ राहण्यास मदत होईल.
महाराष्ट्र सरकारचे हे धोरण शाश्वत, स्वस्त आणि पर्यावरणपूरक असल्याने मुंबईसारख्या शहरांमध्ये खूप उपयोगी ठरू शकते. पण यासोबतच सुरक्षेचे उपाय, इन्फ्रास्ट्रक्चर आणि टॅक्सी-रिक्षा यांचा विरोध कसा हाताळला जातो यावर या योजनेचा यशस्वीपणा अवलंबून राहील.











