संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता! लोकसभेत १५ बैठका, ९२ तास काम, १० विधेयके ८ मंजूरचे कामकाज

0

१ डिसेंबरपासून सुरू झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची शुक्रवारी सांगता झाली. दोन्ही सभागृहांचे कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आले. या अधिवेशनातील निर्णय व कामकाजाचे उत्पादकतेच्या दृष्टीने मूल्यमापन पाहता लोकसभा व राज्यसभेतील कामकाजाची ही उत्पादकता अनुक्रमे १११ आणि १२१ टक्के नोंदवली गेली. या अधिवेशनात दोन्ही सभागृहांत ‘वंदे मातरम’ व मतदारयाद्या पुनरिक्षण (एसआयआर) हे मुद्दे अधिक गाजले.

लोकसभेत ९२ तास कामकाज

लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यापूर्वी सभापती ओम बिर्ला यांनी सांगितले की, या अधिवेशनात एकूण १५ बैठका झाल्या. ९२ तास २५ मिनिटे हे कामकाज चालले.

आठ विधेयके मंजूर

१८व्या लोकसभेच्या सहाव्या अधिवेशनात एकूण १० सरकारी विधेयके सादर करण्यात आली. यातील आठ विधेयके मंजूर झाली. यात ‘विकसित भारत-जी राम जी’ विधेयक-२०२५’, अणुउर्जेसंबंधी शांती विधेयक, विमा कायद्यांतील दुरुस्ती यांचा समावेश होता. याशिवाय ७१ कालबाह्य कायदे रद्द किंवा दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव असलेल्या विधेयकालाही मंजुरी देण्यात आली. तसेच मणिपूर वस्तू आणि सेवा कर, केंद्रीय उत्पादन शुल्क (दुरुस्ती) आणि पान मसाल्यांवर उपकर लावण्याची तरतूद असलेल्या विधेयकांनाही मंजुरी देण्यात आली. दरम्यान, गेल्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनाच्या तुलनेत राज्यसभेची उत्पादकता ३९ टक्क्यांवरून १२१ टक्के इतकी नोंदली गेली.

अधिक वाचा  पावसाच्या प्रतीक्षेतील महाराष्ट्रात वाढला उष्णतेचा पारा; 17 जिल्ह्यांना अलर्ट

यावर चर्चा गाजल्या

राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’च्या १५०व्या वर्धापन दिनानिमित्त आणि निवडणूक सुधारणांसंबंधी मुद्द्यावर झालेली चर्चा दोन्ही सभागृहांत गाजली. ‘वंदे मातरम’च्या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभ केला. यात ६५ सदस्यांनी सहभाग घेतला. मतदारयाद्यांच्या सखोल पुनरिक्षणाच्या मुद्द्यावरून अधिवेशनात पहिले दोन दिवस कामकाज विस्कळीत झाले. नंतर यावर १३ तास चर्चा झाली. यात ६३ सदस्यांनी सहभाग घेतला.

लोकसभेतील कामकाज

शून्य प्रहरात ४०८ मुद्दे उपस्थित झाले. ३०० तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आले. ७२ तारांकित प्रश्नांची तोंडी उत्तरे दिली. एकूण ३,४४९ अतारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आले.

अधिक वाचा  ऑपरेशन टायगर फेल होणार? ओम राजेनिंबाळकरांच्या या विधानाने 5 खासदारांची धाकधूक वाढली; दोन दिवसांत…

राज्यसभेतील गोंधळ शोभणारा नाही : सी. पी. राधाकृष्णन

राज्यसभा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यापूर्वी सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी विविध विधेयकांवर विरोधी पक्षांनी घातलेला गॉथळ शोभणारा नाही, असे सांगून आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. २२ तास सभागृहाचे कामकाज झाले.

५९ खासगी विधेयके

१. राज्यसभेत शून्य प्रहरातील विषयांत रोज सरासरी ८४पेक्षा जास्त सूचना प्राप्त झाल्या. मागील दोन अधिवेशनांच्या तुलनेत ही वाढ ३१ टक्के आहे. रोज सरासरी १५हून अधिक विषय सभागृहात उपस्थित झाले.

२. ‘वंदे मातरम’वरील चर्चेत ८२ सदस्यांनी, तर निवडणूक सुधारणांवरील तीन दिवसांच्या चर्चेत ५७ सदस्यांनी सहभाग घेतला. राज्यसभेने या काळात ८ विधेयके मंजूर केली. ५९ खासगी विधेयके सादर झाली.

अधिक वाचा  महाराष्ट्रावर महादुष्काळाचं संकट, राज्यात 31 ऑगस्टपर्यंतच पाणीसाठा, शेतीसाठी पाणी पुरवठा बंद