पावसाच्या प्रतीक्षेतील महाराष्ट्रात वाढला उष्णतेचा पारा; 17 जिल्ह्यांना अलर्ट

0

राज्यातील हवामानाचा मूड पुन्हा बदलला असून 16 जूनसाठी हवामान विभागाने उष्णतेसह पावसाचाही इशारा दिला आहे. राज्यातील तब्बल 17 जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर 5 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.त्यामुळे काही भागांत कडक ऊन, तर काही भागांत वादळी पावसाचा अनुभव येण्याची शक्यता आहे.

कोकणात उष्णता आणि पावसाचा दुहेरी इशारा देण्यात आला आहे. पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.

अधिक वाचा  इराणनंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांचे पुढील लक्ष्य युक्रेन; रशियाने भेटीस सहमती दर्शवली नाही

उत्तर महाराष्ट्र उष्णतेचा इशारा कायम

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा इशारा कायम आहे. दुपारच्या वेळेत उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवू शकतो. मात्र नाशिकच्या घाटमाथा भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

पश्चिम महाराष्ट्र दुहेरी अलर्ट

पश्चिम महाराष्ट्रात सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोणताही अलर्ट नसला तरी काही ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  संस्थेच्या यशामागे कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे योग्य दखल घेतल्याने नवी ऊर्जा निर्माण होते : प्रवीण बढेकर

मराठवाडा उष्णतेची लाट जाणवू शकते

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये अलर्ट नसला तरी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

विदर्भ उष्णतेचा यलो अलर्ट

विदर्भातील अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांनाही उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात उष्ण आणि कोरडे हवामान कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात पुढील काही दिवस उष्णता, ढगाळ वातावरण आणि अधूनमधून वादळी पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, तर शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच शेतीची कामे करावीत. कृषी विभागाच्या सल्ल्यानंतरच पेरणी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

अधिक वाचा  कर्वेनगरचा कामाचा माणूस पुन्हा सक्रिय! सर्वसामान्यांची अपेक्षा पूर्ती हक्काचं शैक्षणिक संकुल नव्या रूपात