दोघांचा पाठलाग, भररस्त्यात गोळ्या, ओमराजेंना आज न्याय मिळेल? 20 वर्षानंतर वडिल पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचं गूढ उलगडणार

0

महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित ‘पवनराजे निंबाळकर हत्याकांड’ प्रकरणाचा अखेर आज अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे. पवनराजे निंबाळकर हे धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील होते. तब्बल २० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज या हत्येचा संपूर्ण उलगडा होणार आहे. यापूर्वी १४ मे रोजी या खटल्याची सुनावणी होणार होती, मात्र मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील तसेच मोहन शुक्ला हे प्रकृतीचे कारण देत न्यायालयात अनुपस्थित राहिले होते. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने सर्व आरोपींना आज, म्हणजेच १६ जून रोजी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे कडक आदेश दिले आहेत.

अधिक वाचा  ‘छात्रों की गूंज’मध्ये राहुल गांधींनी मांडली महिलांच्या स्वातंत्र्याची नवी भूमिका आत्ता महिलांची ओळख वडील, पती किंवा मुलांमुळे नाही

नेमकं काय आहे प्रकरण?

३ जून २००६ रोजी धाराशिवचे तत्कालीन काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हे मुंबईहून धाराशिवच्या दिशेने जात होते. दुपारी साडेचारच्या सुमारास नवी मुंबईतील कळंबोली येथे राष्ट्रीय महामार्गावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात पवनराजे निंबाळकर यांच्यासह त्यांचे चालक समद काझी यांचा जागीच मृत्यू झाला.

राजकीय वैरातून ३५ लाखांची सुपारी; CBI चा दावा

या हाय-प्रोफाईल हत्येचा तपास सीबीआयकडे (CBI) सोपवण्यात आला होता. सीबीआयने आपल्या तपासात धक्कादायक खुलासे केले. राज्याचे माजी गृहमंत्री आणि माजी खासदार पद्मसिंह पाटील यांनी राजकीय वैराचा वचपा काढण्यासाठी आपले चुलत भाऊ पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा सीबीआयने केला. यासाठी तब्बल ३५ लाख रुपयांची सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणल्याचा आरोप सीबीआयने कोर्टात ठेवला आहे. याप्रकरणी २००९ मध्ये सीबीआयने पद्मसिंह पाटील यांना अटक केली होती, मात्र सप्टेंबर २००९ पासून ते जामिनावर बाहेर आहेत.

अधिक वाचा  बिल न भरल्यास मृतदेह अडवण्यावरचा चाप उठणार? रुग्णांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या नव्या विधेयकावर टीका

या ९ आरोपींच्या भवितव्याचा आज फैसला

या संपूर्ण खटल्यात एकूण ९ जणांना आरोपी करण्यात आले असून आज न्यायालय या सर्वांवर आपला अंतिम निर्णय सुनावणार आहे. पद्मसिंह पाटील (माजी गृहमंत्री व मुख्य संशयित सूत्रधार), दिनेश तिवारी (शूटर), पिंटू सिंग (शूटर), छोटू पांडे, मोहन शुक्ला (माजी नगरसेवक), कैलास यादव (बसपा नेता), शशीकांत कुलकर्णी, सतीश मंदाडे आणि पारसमल जैन अशी नऊ आरोपींची नावं आहेत. तब्बल दोन दशके चाललेल्या या कायदेशीर लढाईकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आज न्यायालयात आरोपींना काय शिक्षा होणार की कोणाची निर्दोष मुक्तता होणार, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

अधिक वाचा  मुंबई-ठाण्यात ED चे छापे 1 कोटी जप्त केंद्रीय अधिकारी असल्याचा भास 113 कोटींच्या क्रिप्टो फसवणुकीचा पर्दाफाश