एल निनोच्या प्रभावामुळे अर्धा जून उलटला तरी पावसाचं चिन्ह नाही. तर राज्यातील धरणांनी तळ गाठलाय. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचं सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे टेन्शन वाढलंय. कारण आता केवळ पिण्यासाठी पाणी मिळणार असून शेतीला पाणी बंद करण्यात आलंय. जर तुम्ही सर्रास पाणी वाया घालवत असाल.. तर आताच थांबा. ही बातमी तुमच्यासाठीच आहे… कारण आपल्या महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडण्याची शक्यताये. फक्त अडीच महिने पुरेल इतकाच पाणीसाठा राज्यातल्या धरणांमध्ये शिल्लक असल्यानं चिंता वाढलीये.






बेकायदा पाणी उपसा रोखण्यासाठी पोलीस आणि महसूल विभाग अँक्शनमोडवर आलंय. महाराष्ट्रात पावसानं ओढ दिल्यानं भीषण पाणीटंचाईचं संकट गडद होतंय. राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ 24.74% जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान कोणत्या विभागात किती जलसाठा शिल्लक आहे ते पाहूयात…
कोणत्या विभागात किती जलसाठा?
अमरावती – 38.03 %
नागपूर – 36.53 %
कोकण – 30.70 %
संभाजीनगर – 27.83 %
नाशिक – 25.20 %
पुणे – 14.57 %
जून महिना अर्ध्यावर आला तरी पाऊस न आल्यानं गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात 5 टक्क्यांची घट झालीय…सध्या राज्यातील 20 जिल्ह्यांमधील साडेतीन हजार गावं आणि वाड्यांची तहान 1 हजार टँकर्सवर अवलंबून आहे. पाऊस लवकर न आल्यास ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. मान्सूनचं आगमन लांबलंय. परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता आहे. आधीच मुंबई, नवी मुंबई, पनवेल, भिंवडी आणि पुण्यात पाणी कपातीला सुरुवात झालीये. त्यामुळे आहे ते पाणी जपून वापरणे आणि सरकारनं पाण्यासाठी नव्या उपाययोजना करण्याची गरज आहे. कारण शेती अडचणीत आली तर सगळंच गणित कोलमडणार यात शंका नाही.













