राजमाता जिजाऊ भोसले यांचा ३५२ वा स्मृतीदिन बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने संपन्न

0

मुंबई दि. १८ (रामदास धो. गमरे) बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता राजमाता जिजाऊ भोसले यांचा ३५२ वा स्मृतीदिन बौद्धजन पंचायत समितीचे सचिव आणि न्यायदान कमिटीचे अध्यक्ष यशवंत कदम यांच्या अधिपत्याखाली बौद्धजन पंचायत समिती केंद्रीय कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

सदर प्रसंगी शिवडी विभागाचे गटप्रमुख आणि विवाह मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंत कदम यांनी राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलित केली. त्यावेळी राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी “राजमाता जिजाऊ यांचा त्याग, कर्तृत्व आणि दूरदृष्टी हेच रयतेच्या स्वराज्याच्या पायाभरणीचे खरे अधिष्ठान होते, त्यांनी बाल शिवाजींच्या मनात स्वराज्याचे स्वप्न रुजवले, धर्म, न्याय, स्वाभिमान आणि जनकल्याणाची मूल्ये त्यांनी शिवाजी महाराजांना बालपणात बाळकडूसारखी पाजली. केवळ माता म्हणूनच नव्हे तर एक आदर्श गुरू, मार्गदर्शक आणि राष्ट्रनिर्माती म्हणून त्यांनी शिवरायांना घडवले. शस्त्रविद्येसोबतच शास्त्रज्ञान, राजकारण, मुत्सद्दीपणा, दूरदृष्टी, नेतृत्वगुण आणि संकटांवर मात करण्याचे धैर्य यांचे संस्कार त्यांनी शिवरायांवर केले आणि त्यांच्याच शिकवणीमुळेच शिवाजी महाराजांनी अन्यायाविरुद्ध उभे राहत स्वराज्याची भक्कम उभारणी केली. स्वराज्याच्या प्रत्येक यशामागे राजमाता जिजाऊंचे त्यागमय मातृत्व, प्रेरणा आणि दूरदर्शी विचारांचा सिंहाचा वाटा आहे, सिंदखेडराजाच्या लखोजी जाधव यांच्या सुकन्या आणि भोसले घराण्याची सुनबाई म्हणून जिजाऊनी दोन्ही घराणी मान सन्मान बाळगत सांभाळली. राजमाता जिजाऊ यांची रायगडाच्या पायथ्याशी पाचाड गावी बौद्ध वस्तीजवळील स्मशानभूमीत समाधी आहे आज ही अनेकजण त्याठिकाणी दर्शनाला जातात” असे नमूद करीत राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेस अभिवादन करून राजमाता जिजाऊंना मानवंदना दिली.

अधिक वाचा  पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट २३ गावांचा एमआर&टीपी ॲक्टच्या नव्या बदलानुसार लोकल एरिया प्लॅन करा: केसकर

अध्यक्षीय भाषणात यशवंत कदम यांनी राजमात जिजाऊ यांच्या जीवनपटावर प्रकाशझोत टाकत असता “माझ्या आयुष्यात पाच वेळा मला रायगडावर जाण्याचे सौभाग्य मिळाले, रायगडावर जाताना पाचाड येथे मां साहेब जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेऊन आम्ही रायगडावर जातो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात राजमाता जिजाऊंचा सिंहाचा मोठा वाटा आहे, शहाजीराजे अनेकदा मोहिमांवर असल्यामुळे शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत जिजाऊंची भूमिका अधिक महत्त्वाची ठरली त्यांनी संकटांच्या काळात धैर्य न गमावता शिवरायांना स्वराज्य स्थापनेच्या ध्येयाशी एकनिष्ठ राहण्याची प्रेरणा दिली. परकीय सत्तांच्या जुलूमाखाली भरडल्या जाणाऱ्या रयतेची वेदना त्यांनी जवळून पाहिली होती, त्यामुळे बाल शिवाजींच्या मनात स्वराज्य, स्वाभिमान, न्याय आणि धर्मरक्षण यांची बीजे त्यांनी लहानपणापासूनच रुजवली.” असे त्यांनी नमूद करून राजमाता जिजाऊंना मानवंदना दिली.

अधिक वाचा  शरद पवार यांच्या कुस्तिगीर परिषदेला उच्च न्यायालयाकडून दणका; १ जानेवारी २०२३ रोजीचा भारतीय कुस्ती महासंघाचा हा निर्णय कायम

सदर कार्यक्रमास बौद्धजन पंचायत समितीचे कार्यालयीन सचिव संजय मोहिते, प्रदीप तांबे, राहुल कदम, प्रदीप कदम, जाधव असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सरतेशेवटी राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर, उपसभापती विनोद मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, सरचिटणीस राजेश घाडगे, खजिनदार नागसेन गमरे व सर्वांच्या वतीने राजमाता जिजाऊ भोसले यांना मानवंदना देऊन सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.