बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; पुढच्या चार दिवसात पावसाची शक्यता मॉन्सून पुन्हा सक्रीय होणार?

0

दक्षिण भारतापासून उत्तर भारतापर्यंत मॉन्सून वाऱ्याचा वेग वाढत असून अनेक राज्यांत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तापमानातही घट होणार आहे. देशभरात सक्रिय झालेला मॉन्सून अचानक थांबल्याने अनेकांना आशा लागून राहिली होती. दरम्यान पुढच्या तीन दिवसात पावसाच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

उत्तर भारतातील दिल्ली, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्य प्रदेश, दक्षिण छत्तीसगड, उत्तर प्रदेश, गुजरात, विदर्भ तसेच कोकण आणि गोवा या भागांमध्येही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, १८ जूनपासून उत्तर-पश्चिम भारताच्या दिशेने वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली. त्यामुळे पुढील काही दिवसांत हवामानात आणखी बदल होऊन पावसाला वेग येऊ शकतो. याआधी देशातील अनेक भागांत मॉन्सूनच्या प्रगतीला काही प्रमाणात खीळ बसल्याने पावसात तूट निर्माण झाली होती.

अधिक वाचा  सृष्टी फाउंडेशनतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५१ देशी वृक्षांची लागवड

मात्र, सध्या सक्रिय झालेल्या हवामान प्रणालीमुळे मॉन्सूनला पुन्हा गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परिणामी, शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील चार ते पाच दिवसांत तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या आणखी काही भागांमध्ये नैऋत्य मॉन्सूनच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मॉन्सूनचा विस्तार अधिक वेगाने होण्याची शक्यता असून देशातील आणखी काही भाग मॉन्सूनच्या प्रभावाखाली येण्याची अपेक्षा आहे.