पुण्यात बालेकिल्ले भेदण्यासाठी मित्र पक्षाची ‘बेगडी’चाल ‘राष्ट्रवादी’त मोठी अस्वस्थता; जिल्ह्यातील ७५४ ग्रामपंचायतींतून नवा मार्ग शोधला?

0

पुणे जिल्ह्यातील मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बालेकिल्ले भेदण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने वेगळी चाल खेळली जात आहे. भारतीय जनता पक्ष आपल्या मूळ प्रवृत्तीनुसार कायम निवडणुकीचा विचार करत असल्याने ७५४ ग्रामपंचायतींच्या प्रभागांची फेररचना पक्ष हितार्थ कशी करता येईल यासाठी मोठ्या हालचाली सुरू केले आहेत. नुकत्याच झालेल्या पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने सर्वाधिक जागा मिळवत पुणे जिल्ह्यात ‘दादा’ असल्याचे दाखवून दिले. दुसऱ्या स्थानावर मुसंडी मारणारा भाजप हा आता पुणे जिल्ह्यात गावपातळीवरील पायामुळे भक्कम करण्यासाठी व्यूहरचना आखत असल्याची चर्चा असल्याने प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात अस्वस्थता पसरली आहे.

लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत या निवडणुका झाल्यानंतर आता डिसेंबर महिन्यात पुणे जिल्ह्यातील ७५४ ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. त्यासाठी प्रभागांची फेररचना करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभाग रचनेचा प्रारूप मसुदा तयार केला आहे. लोकसंख्या वाढ, भौगोलिक बदल याचा विचार करून नव्याने प्रभाग रचना तयार करण्यात येणार आहे. त्यावर नागरिकांकडून हरकती आणि सूचना नोंदविण्यात आल्या आहेत. प्रारुप प्रभागरचनेचा आराखडा जिल्हा प्रशासनाकडून या आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे.

अधिक वाचा  सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची नवीन पॉलिसी; कार्यालयातील टक्केवारीनुसार असेल बदलीचा प्राधान्यक्रम

पुणे शहराजवळील २३ गावांचा महापालिकेत समावेश

येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामंपचायतींमध्ये आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, पुरंदर, शिरूर आणि वेल्हा या तालुक्यांतील ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी पुणे शहराजवळील हवेली तालुक्यातील २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या गावांजवळील ग्रामपंचायतींची मोठ्या प्रमाणात फेररचना होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

राष्ट्रवादीचे वर्चस्व कमी करण्यासाठी व्यूहरचना?

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ने सर्वाधिक जागा मिळवत पुणे जिल्ह्यात ‘दादा’ असल्याचे दाखवून दिले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’ बहुतांश ठिकाणी एकत्र होते. त्याचा या पक्षांना फायदा झाला. भाजप हा दुसऱ्या स्थानावर रहिला. शिवसेना (ठाकरे) गटाने शिवसेना (शिंदे) गटापेक्षा जास्त जागा मिळवित तिसरे स्थान पटकावले. काँग्रेसला मात्र एकाही जागेवर यश मिळाले नाही. जिल्ह्यात ‘राष्ट्रवादी’चे प्राबल्य असल्याने ते कमी करण्यासाठी फेररचना ही सोयीची करण्याच्यादृष्टीने भाजपकडून व्यूहरचना आखण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे सध्या दोन्ही ‘राष्ट्रवादी’ हे भाजपच्या हालचालींवर लक्ष ठेऊन असल्याचे सांगण्यात आले.

अधिक वाचा  यंदा ‌’अल निनो‌’मुळे खडकवासला धरणातील राखीव पाण्याबाबत हा निर्णय; 1 कोटी नागरिकांसाठी जलसंपदा विभागाची कठोर उपाययोजना

मुळशीकडे भाजपचे लक्ष

मुळशी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या तीनपैकी दोन आणि पंचायत समितीच्या सहापैकी तीन जागांवर यश मिळविले. मुळशीत मान हिंजवडी या गटात भाजपचे शिवाजी बुचडे हे विजयी झाले. आतापर्यंत या तालुक्यात भाजपला शिरकाव करता आला नव्हता. आता भाजप या तालुक्यात भाजपची पायामुळे भक्कम करण्यासाठी नियोजन करत आहे.

माजी आमदारांच्या साथीने पुरंदर, भोरमध्ये पायाभरणी

पुरंदरचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप आणि भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस तग धरून होती. जगताप आणि थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नगर परिषदेच्या निवडणुकीत सासवड वगळता अन्य ठिकाणी भाजपला शिरकाव करता आला नाही. या वेळच्या निवडणुकीत काँग्रेसच्या या माजी आमदारांमुळे भाजपने शिरकाव केला आहे. आता या दोन्ही माजी आमदारांच्या साथीने पुरंदर आणि भोरमध्ये ग्रामपंचायतींच्या माध्यमातून पायाभरणी करण्याची तयारी करत असल्याचे दिसून येते.

मावळमध्ये पुन्हा उभे राहण्यासाठी धडपड

मावळ तालुक्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ आणि भाजप यांच्यात लढत होती. या तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या दहा जागांवर अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ने विजय साकारला. आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्त्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली. माजी आमदार बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणूक लढविली. मात्र, भाजपला एकाही जागा मिळाली नाही. त्यामुळे भाजप हा मावळ तालुक्यात पुन्हा उभे राहण्यासाठी ग्रामपंचायतींच्या नवीन प्रभाग रचना ही फायदेशीर राहील, यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले.

अधिक वाचा  ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ ३३ % महिला आरक्षण आज संसदेचे 2 दिवस विशेष अधिवेशन सुरु; अशी आहे संरचना

इंदापूरमध्ये नव्याने नियोजन

इंदापूर तालुक्यात राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे एकत्र आल्याने जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपचा निभाव लागला नाही. या ठिकाणी सर्व जागा ‘राष्ट्रवादी’ला मिळाल्या. भाजपचे नेते प्रवीण माने यांच्या साथीला अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’चे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे असतानाही भाजपला मतदारांनी नाकारलेे. त्यामुळे आता ग्रामपंचायतींतून भाजपचा पाया नव्याने रचण्याचे नियोजन भाजपकडून करण्यात येत आहे.

दौंडमध्ये ताकद वाढविण्याचा प्रयत्न

दौंंड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व जागा ‘राष्ट्रवादी’ला मिळाल्या. त्यामुळे भाजपचे आमदार राहुल कुल यांना फटका बसला आहे. पंचायत समितीत मात्र कुल यांना काही जागा मिळवता आल्या. आता ग्रामपंचायतींमध्ये भाजपची ताकद वाढण्याचा प्रयत्न आमदार कुल यांचा असणार आहे.