राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ऐनवेळी भाजपच्या विनंतीनंतर माघार घेणारे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव प्रचंड चर्चेत आहे. खरंतर तनपुरे भाजपमध्ये (BJP) जातील, सत्तेत सहभागी होतील, अशी जोरदार राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, आता प्राजक्त तनपुरे यांच्या एका सूचक वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या तत्त्व सांभाळणाऱ्यांचे राजकारण संपत चालले आहे, असे वक्तव्य तनपुरे यांनी केले. ते शुक्रवारी ‘एबीपी माझा’शी बोलत होते.






प्राजक्त तनपुरे यांनी यापूर्वी अनेकदा संधी असतानाही सत्तेत न जाता पक्षनिष्ठा सांभाळली. परंतु, निष्ठा, तत्व सांभाळतांना राजकीय नुकसान झाल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. माझ्यासोबत पक्षात असणारे तिघेजण राष्ट्रवादी अजित पवार पक्षात गेले , तिकडे त्यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाले. मात्र, दुसरीकडे आमच्यासारखे निष्ठा ठेवणाऱ्या राजकारण्यांचे राजकारण संपत चालले आहे याचे दुःख होते, अशी भावना प्राजक्त तनपुरे यांनी बोलून दाखवली. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव आला होता. पण मला निष्ठा, तत्व याच्याशी प्रामाणिक राहावं असे वाटले. पण सध्याचे राजकारण म्हणजे जो तत्वाशी जोडला राहिल त्याचे राजकारण संपत आहे, याउलट जे तत्त्वांशी तडजोड करतात ते सत्तेत मोठ्या पदावरती जातात अशी स्थिती आहे, अशी खंत प्राजक्त तनपुरे यांनी बोलून दाखवली. त्यांच्या या वक्तव्यानंतर प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये जाण्याच्या पर्यायाचा गांभीर्याने विचार करत आहेत अथवा त्यांनी त्यांचा निर्णय घेतला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
तनपुरेंच्या वक्तव्यावर शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ABP माझाशी बोलताना निष्ठा, तत्व सांभाळतांना राजकीय नुकसान झाल्याची खंत बोलून दाखवली. सध्याचे राजकारण म्हणजे जे तत्त्वांशी तडजोड करतात ते सत्तेत मोठ्या पदावरती जातात अशी स्थिती आहे, असंही तनपुरे म्हणाले होते. यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सध्याचे राजकारण असं आहे की, विरोधी पक्ष किंवा विरोधी नेता शिल्लकच राहू नये. अशाप्रकारची प्रथा देशात आणि राज्यात सुरू आहे. वेगवेगळे गुन्हा दाखल करून दबाव आणण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. याला लोकशाही म्हणत नाही, असे शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.













