“राष्ट्रवादी दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा निर्णय आता…”, शरद पवार म्हणाले भवितव्याबद्दल दोन विचाराचे लोक

0

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यानं राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न आता यानंतर निर्माण झाला आहे. शरद पवार यांनी ऑफ द रेकॉर्ड बोलताना याबद्दलचं मत मांडल्याची माहिती आहे. जर एनसीपीचे दोन्ही गट एकत्र आले तर त्यात आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. याबाबतचा अंतिम निर्णय पुढील पिढीच्या नेत्यांनीच घ्यायचा आहेृ असं पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, “सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्र येण्याबाबतचा निर्णय घ्यावा. दोन्ही गटांची विचारधारा जवळपास एकसारखीच आहे. मी स्वतःला या प्रक्रियेतून बाहेर ठेवतोय.”

अधिक वाचा  ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेत आधीच्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या १२.७१ लाख शेतकऱ्यांना फटका

पक्षात दोन विचारधारा – शरद पवार

एनसीपी (SP) च्या भवितव्याबद्दल विचारलं असता, शरद पवार यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होतं की, “पक्षात दोन विचार आहेत. एक म्हणजे, आपण पुन्हा एकत्र यावं. दुसरा म्हणजे, पक्षाचे काही लोक थेट भाजपसोबत जाऊ इच्छित नाही. इंडिया आघाडीला पुन्हा मजबूत करावं असं त्यांना वाटतं.”

शरद पवार पुढे म्हणाले की, इंडिया आघाडी सध्या सक्रिय नाही. त्यामुळे आपल्या पक्षाला पुन्हा संघटित करावं लागेल. पक्षाची पुनर्बांधणी करावी लागेल. तरुणांना सामील करून घ्यावं लागेल आणि कामाला लागावं लागेल. माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी स्पष्ट केलं की, आमचा विचार विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचा आहे. भाजपला पर्याय म्हणून विश्वासार्ह शक्ती निर्माण करायची आहे.

अधिक वाचा  हडपसर अवैध दारूकडे दुर्लक्ष महागात माहिती असूनही कारवाई नाही पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह 3 पोलिसांवर निलंबनाची कारवाई

अजित पवारांशी भेट राजकीय नव्हती – शरद पवार

अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या भेटीवर शरद पवार बोलले. ती भेट राजकीय नव्हती. आम्ही शैक्षणिक संस्थांसह अनेक संस्थांमध्ये त्यांच्यासोबत, एनडीएसोबत, डाव्या पक्षांसोबत काम करतो आणि ते सुरू ठेवू,” असं पवारांनी सांगितलं होतं.

जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादीत पडली होती फूट

जुलै 2023 मध्ये एनसीपीत फूट पडली होती. अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि अनेक आमदारांसह शिवसेना-भाजप आघाडीच्या सरकारमध्ये सामील झाले. तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि अजित पवार उपमुख्यमंत्री बनले. या बंडखोरीचा वाद निवडणूक आयोगापर्यंत गेला. आयोगानं अजित पवार यांच्या गटाला खरी एनसीपी मानलं, तर शरद पवार यांच्या पक्षाला ‘NCP-SP’ असं नाव देण्यात आलं. दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चा अनेकदा होत असतात. त्यातच आता शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली आहे.

अधिक वाचा  कलयुगाचा ‘तुकाराम’ पुढील अध्याय सुरू? कर्तव्याचे कौतुक; मिस लीडिंग ॲडव्हर्टायझिंग आत्ता सेलिब्रिटींवर कारवाई