काँग्रेसचे प्रवक्ते होण्यासाठी ‘नॅशनल टॅलेंट हंट’ मोहिमेअंतर्गत प्रदेश काँग्रेसकडे तब्बल पाच हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. निवडक इच्छुकांच्या नुकत्याच मुलाखती प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात पार पडल्या असून पक्षाबाहेरील व रुढार्थाने कार्यकर्ते नसलेल्या डॉक्टर, सरकारी अधिकारी व अभियंत्यांचा मोठ्या संख्येने या इच्छुकांमध्ये भरणा आहे. प्रवक्ते, राजकीय संशोधक आणि समाज माध्यम तज्ञ नेमण्यासाठी पक्षाकडून गुणवंताचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी काँग्रेसने ‘नॅशनल टॅलेंट हंट’ मोहीम राबवली आहे. राज्यात या मोहिमेत पाच हजार इच्छुकांचे अर्ज आले आहेत. पैकी २५० निवडकांच्या मुलाखती परळच्या टिळक भवनात नुकत्याच पार पडल्या. निवडलेल्यांची नावे केंद्राला पाठवली असून लवकरच त्यांची घोषणा केली जाईल, असे काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात आले.






पक्षाच्या बाहेरील व्यक्तींना काँग्रेसने प्रवक्तेपदासाठी प्रथमच दारे खुली केली आहेत. निवडलेल्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याबरोबरच काँग्रेसचे ‘संघटन सृजन’ अभियान सुरु असून त्यामध्ये जिल्हा व तालुका अध्यक्षांच्या निवडी मुलाखती घेऊन करण्यात येत आहेत. आमदारांच्या सहमतीने या निवडीची पक्षात प्रचलीत पद्धत होती. प्रस्थापितांच्या विरोधामुळे काँग्रेसचे हे अनोखे अभियान वादात सापडले आहे.
काँग्रेसच्या या निर्णयाने पक्षातील प्रस्थापित नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. आम्ही म्हणेल ती जिल्हात व पक्षात दिशा अशी काँग्रेसची आजपर्यंतची पद्धती होती. काँग्रेसने खास अभियान राबवून प्रज्ञावंताचा शोध घेतला असून प्रवक्ते, संशोधक आणि समाज माध्यम तज्ञपदाची जबबादारी या पक्षात सक्रीय नसणाऱ्या व कार्यकर्ते म्हणून काम न केलेल्यावर टाकली जाणार आहे.
एसआयआर’ चे मार्गदर्शन
महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर मुंबई युवक काँग्रेसच्यावतीने कार्यकर्त्यांसाठी रविवारी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘एसआयआर’ प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत युवक काँग्रेसच्या वतीने मतदारांना मार्गदर्शन व मदत करण्यात येणार आहे.
मुंबई युवक अध्यक्षा झीनत शबरीन यांनी यासंदर्भात सांगितले की, एसआयआर प्रक्रिया ज्या राज्यात राबविण्यात आली, त्या ठिकाणी लाखो मतदारांची नावे वगळल्याची उदाहरणे आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत कोणत्याही पात्र मतदाराचे नाव चुकीच्या पद्धतीने वगळले जाऊ नये, यासाठी युवक काँग्रेसच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सुसज्ज करून प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्याचा आमचा निर्धार आहे.













