कुंडमळा पुल कोसळल्यानंतर स्थानिक ट्रेकिंग व बचाव गटांनी दाखवलेली तत्परता पुन्हा एकदा प्रकाशात आली आहे. वन्य जीव रक्षक संस्था मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा, आणि मावळ अॅडव्हेंचर्स यांसारख्या स्वयंसेवी गटांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शोध व बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
हे गट स्थानिक स्वयंसेवकांचे तयार झालेले प्रशिक्षित पथक असून, त्यांना परिसराची चांगली ओळख, कठीण परिस्थितीत काम करण्याचा अनुभव आणि आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण लाभले आहे. पुर, दरड कोसळणे, घाटांतील धुके अशा संकटांमध्ये हे गट सरकारी यंत्रणांना मोलाची साथ देतात.
हे स्वयंसेवक केंद्र सरकारच्या ‘आपदा मित्र’ योजनेअंतर्गत प्रशिक्षित झाले असून, त्यांच्याकडे प्राथमिक बचाव साहित्य उपलब्ध आहे. अत्यंत दुर्गम भागांमध्ये सरकारी मदत पोहोचण्यापूर्वी हे गटच प्रत्यक्ष बचाव कार्यात उतरतात.
वन्य जीव रक्षक संस्था मावळ ही संस्था निलेश गराडे यांनी २०१० मध्ये स्थापन केली. सुरुवातीला प्राणी बचावावर लक्ष केंद्रित करणारी ही संस्था आता पाण्यातील बचाव कार्यातही कार्यरत आहे. आज या संस्थेचे ३०० हून अधिक सदस्य आहेत. त्यांनी आजपर्यंत ४०० हून अधिक मृतदेह विनामूल्य शोधून काढले आहेत.
शिवदुर्ग मित्र लोणावळा, ही संस्था १९८० साली विष्णू गायकवाड यांनी स्थापन केली. २००० पासून त्यांनी पाण्यातील बचाव कार्य सुरू केलं. आज या संस्थेकडे १० प्रशिक्षित स्कुबा डायव्हर्स, मोटरबोट्स, १,००० फूट दोर, हार्नेस, वॉकी-टॉकी आणि स्ट्रेचर्स आहेत. त्यांनी १,५०० हून अधिक जणांचे प्राण वाचवले आणि ३५० पेक्षा जास्त मृतदेह शोधून काढले आहेत.
मावळ अॅडव्हेंचर्स, ही संस्था १९९० मध्ये स्थापन झाली व २०१६ मध्ये नोंदणीकृत झाली. किल्ले संवर्धन आणि वारसास्थळांच्या जतनातून त्यांनी आपले कार्य सुरू केले. संस्थेचे १०० पेक्षा अधिक स्वयंसेवक आहेत. संस्थेचे प्रमुख विश्वनाथ जावळीकर यांनी सांगितले की, प्रत्येक बचाव मोहिमेचा खर्च रोज ₹१५,००० ते ₹२०,००० असतो, आणि ते स्वतः त्यांच्या व्यवसायातून ३५% उत्पन्न यासाठी देतात.
खोपोलीतील हेल्प फाउंडेशन, ही संस्था २०१७ मध्ये स्थापन झाली असून आज त्यांच्याकडे १,००० हून अधिक स्वयंसेवक, त्यापैकी ५० ‘फ्रंटलाइन’ बचावकर्ते आहेत. ही संस्था पाणी बचाव, अपघात मदत व गळतींसारख्या आपत्कालीन घटनांमध्ये प्रशासनाला सहाय्य करते.
यशवंत हायकर्स खोपोली, ही संस्था १९८३ मध्ये स्थापन झाली असून, १९८६ मध्ये झालेल्या बोरघाट दुर्घटनेपासून ते बचाव कार्यात सक्रीय आहेत. त्यांनी उत्तरकाशी भूकंप (१९९१), इर्शाळवाडी व तळीये दरड, चिपळूण पूर अशा अनेक मोठ्या आपत्तींमध्ये काम केले आहे.
‘आपदा मित्र’ ही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने २०१६ मध्ये सुरू केलेली योजना असून, देशभरातील ३० पूरप्रवण जिल्ह्यांत ६,००० स्वयंसेवक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
पुणे जिल्ह्यातील ५०० स्वयंसेवकांना ‘आपदा मित्र’ म्हणून NDRF कडून १२ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बानोटे यांनी सांगितले की, “या स्वयंसेवक गटांमुळे कठीण भूप्रदेशात, तात्काळ प्रतिसाद देणे शक्य होते. त्यामुळे हे गट प्रशासनासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.”
आता हा आकडा १,५०० पर्यंत नेण्याचे नियोजन असून त्यात NCC व NSS विद्यार्थी यांनाही समाविष्ट करण्यात येणार आहे.