विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतरही महायुतीचा सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा तिढा कधी सुटणार, याबाबत नेत्यांकडून वरवरची उत्तरे दिली जात आहेत.त्यातच बुधवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत घेणार असल्याचे जाहीर केल्यानंतर ते काय भूमिका मांडणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.






शिंदे यांच्या पत्रकार परिषदेआधी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केले आहे. राज्यातील सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदाच्या तिढ्यावर बोलताना त्यांनी तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित निर्णय घेतील, असे स्पष्ट केले आहे. तिन्ही पक्ष एकत्रितपणे सरकार बनवतील. सर्वजण एकत्रित बसून याबाबत निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित बसून निर्णय घेतील, असे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप नेत्यांची एकत्रित बैठक झालेली नाही. निकाल लागून तीन दिवस उटलले तरी हा तिढा कायम आहे. शिवसेनेचे नेते शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी आग्रही आहेत. तसेच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह याबाबत निर्णय घेतील, असेही सांगत आहेत. त्यामुळे याबाबतचा संभ्रम वाढत चालला आहे.
भाजप नेत्यांकडूनही देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आग्रह धरला जात आहे. भाजपकडून फडणवीस यांचे नाव निश्चित मानले जात आहे. याबाबत तिन्ही पक्षांच्या एकत्रित पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली जाईल, अशीही चर्चा आहे. पण अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, अमित शाह हे गुरूवारी तिन्ही पक्षांच्या नेत्यांना दिल्लीत भेटणार असल्याचे समजते. पण त्यापूर्वीच शिंदे यांची पत्रकार परिषद होत असल्याने ते काय बोलणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत ते काय निर्णय घेणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.











