बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने संत गाडगे महाराजांचा १५० व्या जयंती महोत्सव केंद्रीय कार्यालयात संपन्न

0

मुंबई दि. २४ (रामदास धो. गमरे) महापुरुषांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्यांचे विचार आचरणात आणून त्यावर चालणारी बौद्धजन पंचायत समिती एक अग्रगण्य संस्था आहे म्हणून संत गाडगे बाबा यांचा १५० वा जयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी गाडगे बाबांच्या प्रतिमेला लक्ष्मण भगत यांनी पुष्पहार अर्पण केले तद्नंतर महाड क्रांतीभुमीचे माजी अध्यक्ष पाटणे यांचे चिरंजीव राजेंद्र पाटणे यांनी ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमास प्रारंभ केला. बौद्धाचार्य मंगेश पवार यांनी आपल्या गोडवाणीने धार्मिक पूजा विधी पठण केले. सरचिटणीस राजेश घाडगे यांनी आपल्या भारदस्त आवाजात सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रस्ताविक सदर करीत असताना “संत गाडगे महाराजांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे डेबूजी झिंगराजी जानोरकर व सखुबाई झिंगराजी जाणोरकर यांच्या पोटी अत्यंत गरीब घरात झाला, त्यामुळे त्यांचं बालपण गरिबीत गेले होते परंतु त्यांनी आपले संपूर्ण जीवन दिनदलित व पीडित शोषित समाजाच्या उद्धारासाठी अर्पण केले होते, ते विज्ञानवादी असून त्यांना अंधश्रध्देची, कर्मकांड याची भयंकर चीड होती. अनाथ, गरजू मुलांसाठी त्यांनी शाळा, अनाथाश्रम, धर्मशाळा निर्माण केल्या होत्या. डॉ. बाबासाहेबांचा आणि गाडगे महाराजांचा जवळचा स्नेह असून ते बाबासाहेबांच्या जातीअंताची लढाईच्या आंदोलनाचे ते खंदे कार्यकर्ते होते, ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर बाबासाहेबांवर नितांत प्रेम असणारे गाडगे महाराज खचले त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला आणि बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर १४ व्या दिवशी म्हणजे २० डिसेंबर १९५६ रोजी गाडगे महाराजांची ही प्राणज्योत मावळली. अश्या महान संताचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण पुढची वाटचाल करायला हवी” असे नमूद करून गाडगे महाराजांना मानवंदना दिली. त्यानंतर कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी आपल्या भाषणात “गोरगरीब, गरजूंना धर्मशाळा, वस्तीगृहे, शाळा, आश्रमशाळा, अनाथाश्रम उभारल्या, तळागाळातील लोकांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, अनिष्ट रूढी परंपरा यापासून दूर राहून विज्ञानाची कास धरावी असे ते आपल्या किर्तनातून प्रबोधन करीत. वरळी येथील सध्याच जे कामगार हॉस्पिटल आहे तेथे पूर्वी मोठ मैदान होत त्या मैदानात एकदा बाबासाहेबांची सभा चालू असताना हार घेऊन दोन हात वर करत गाडगे महाराज पुढे आले व बाबासाहेबांनी म्हणाले बाबासाहेब तुम्ही खाली या तर बाबासाहेब गाडगे महाराजांना म्हणू लागले गाडगे बाबा तुम्ही स्टेजवर या परंतु गाडगे महाराज ऐकण्यास तयारच नव्हते त्यामुळे बाबासाहेब थोडे चिडले ही परंतु गाडगे महाराज म्हणाले बाबासाहेब तुम्ही ज्या स्टेजवर उभे आहात त्या स्टेजवर येण्याची माझी पात्रता नाही म्हणून तुम्ही खाली या हे शब्द बाबासाहेबांच्या कानावर पडताच बाबासाहेब स्टेजवरून खाली उतरले व गाडगे महाराजांचा पुष्पहार स्वीकारला व दोन महापुरुषांची गळाभेट झाली जेव्हा बाबासाहेब पुन्हा स्टेजकडे वळले तेव्हा स्टेजवर एकही माणूस नव्हता सर्वजण बाबासाहेबांच्या मागोमाग गाडगे महाराजांच्या स्वागतासाठी स्टेजवरून खाली उतरले होते यावरून गाडगे महाराज व बाबासाहेबांचे किती जिव्हाळ्याचे नाते होते हे लक्षात येते. अश्या दोन्ही महापुरुषांचे विचार आपण आत्मसात करून त्यावर चिंतन करून त्या विचारावर चालले पाहिजे” असे नमूद करून गाडगे बाबांना मानवंदना दिली.

अधिक वाचा  महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान; निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर

सदर कार्यक्रमास सचिव लवेश तांबे, प्रकाश करुळेकर, विवाह मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, गौतम जाधव, मंगेश पवार, निवडणूक मंडळाचे सचिव अशोक कदम, राहुल कदम, माजी चिटणीस तुळशीराम शिर्के, महाड तालुका माजी अध्यक्ष पाटणे यांचे चिरंजीव राजेंद्र पाटणे, कार्यालयीन सचिव संजय मोहिते, सेवक प्रदीप तांबे आदी मान्यवर उपस्थित होते सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व उपस्थितांचे आभार मानून सरचिटणीस राजेश घाडगे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.