महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणूक होणार आहे.यातील ६ जागांसाठी महायुतीने जोरदार फिल्डिंग लावली आहे. महायुतीमधील भाजप पक्ष ४ जागांवर निवडणूक लढणार आहे. त्यातील एक जागा रामदास आठवलेंसाठी निश्चित करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. त्यानंतर उर्वरित ३ जागांवर कुणाला संधी मिळणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपची आज मंगळवारी महत्वाची बैठक वर्षा निवासस्थानी सुरू आहे.






राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपची महत्वाची बैठक सुरू आहे. राज्यसभा निवडणूक २०२६ साठी उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची ही बैठक होत आहे. या बैठकीला प्रदेशध्यक्ष रविंद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे ,चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेते पोहोचले आहेत.
एका जागेवर रामदास आठवले यांचे नाव निश्चित झाले आहे. तर इतर उर्वरित तीन उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी बैठकीत चर्चा होणार आहे. तीन उमेदवारांमध्ये विनोद तावडे, विजया रहाटकर आणि धैर्यशील पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. त्यामुळे राज्यसभेसाठी कुणाला संधी मिळणार, हे येत्या काही तासांमध्ये स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी, राज्यसभेच्या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश आहे. राज्यसभेसाठी भाजपकडून ४ उमेदवार देण्यात येणार आहे. भाजपकडून रामदास आठवले यांचे नाव जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे इतर ३ नावांसंदर्भात कोअर कमिटीच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.













