विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने लागू केलेल्या लाडकी बहीण योजनेची पडताळणी राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणीने आपला योजनेचा फायदा सोडावा, असे आवाहन देखील राज्यसरकारने केले आहे. एकीकडे राज्य सरकार स्वतःहून लाडक्या बहिणींना योजनेचा फायदा सोडण्याचा आवाहन करत आहे. तर दुसरीकडे चारचाकी गाडी असलेल्या बहिणीची यादी सरकारकडून करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.






पुणे दौऱ्यावरती असताना माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला अतिशय आनंद आहे.दिल्ली विधानसभेवर २७ वर्षा नंतर भाजपचा झेंडा रोवला गेला आहे. दिल्लीतील नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवला आहे आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटला आहे. केजरीवाल यांनी खोटी आश्वासन देऊन दिल्लीवर राज्य केलं मात्र त्या खोट्या आश्वासनांच्या परंपरेचा आज अंत झाला आहे. खोट राजकारण चालणार नाही हे दिल्लीच्या लोकांनी दाखवून दिलं आहे. दिल्लीतील मराठी माणूस हा भाजपच्या बाजूने उभा राहिला याचा मला आनंद असल्याचे देखील फडवणीस म्हणाले.
राहुल गांधींना लगावला टोला –
राहुल गांधी यांनी काल घेतलेली पत्रकारपरिषद हे त्यांचे कव्हर फायरिंग होतं. त्यांना माहीत होतं दिल्लीत आपल्याला काही यश मिळणार नाही. त्यामुळे हरल्यानंतर काय मुद्दे मांडायचे याची त्यांनी पूर्वीच तयारी करून ठेवली होती अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
राहुल सोलापूरकरांना सुनावलं –
राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर बोलत असताना जनभावनेचा विचार करूनच बोलणं आवश्यक आहे. इतिहासाचं विकृतीकरण हे कोणाच्याही हाताने होऊ नये. त्यांनी याबाबत माफी मागितली आहे आणि त्याबाबत योग्य ती कारवाई होईल, असं आश्वासन देवेंद्र फडणीस यांनी दिल.
तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आता नव्याने काही निकष समोर येऊ लागले आहेत. याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”कुठलाही नवीन निकष लाडकी बहीण योजनेत लावलेला नाही. योजना घोषित केली तेव्हा जे निकष होते, त्या निकषापेक्षा वेगळे ज्यांनी अर्ज केले, त्यांच्यावरच ही कारवाई होत आहे. मला आनंद आहे की, आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वत: निर्णय केला की आम्ही आता निकषाबाहेर गेललो आहोत, त्यामुळे आता आम्ही हा लाभ घेणे सोडतो आहोत. कुणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही, परत मागणार नाही.













