एकनाथ शिंदेंची रणनीती होणार यशस्वी; अमित शाहांच्या भेटीनंतर महायुतीमधील कोंडी सुटणार?

0

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. मात्र, महायुतीमधील सत्ता वाटपाचा घोळ शेवटच्या क्षणापर्यंत सुरु होता. त्यामुळे सरकार स्थापनेला वेळ लागला. त्यातच खातेवाटपावरून नाराजी असल्याने शपथविधीला वेळ लागला. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारही काही काळ लांबला होता. त्यानंतर पालकमंत्री पदावरून महायुतीमधील तीन पक्षात रस्सीखेच पहावयास मिळाली. त्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा रंगली होती. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरु असतानाच दोन दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. त्यामुळे या भेटीवेळी नेमके काय घडले ? त्यामुळे येत्या काळात महायुतीमधील तीन पक्षातील कोंडी सुटणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा  “जरा बारामतीकडेही लक्ष द्या!”, दादा जाताच समस्यांनी डोकं वर काढलं? पवार कुटुंबाला लिहिलेल्या खुल्या पत्राने खळबळ

महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदावरून गेल्या काही दिवसापासून तिढा आहे. प्रजाकसत्ताक दिनापूर्वी रायगड, नाशिकसह काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये एकवाक्यता नसल्याची चर्चा सुरू आहे. पालकमंत्री पदाच्या वादाबाबत एकनाथ शिंदे यांनी शाह यांच्यासोबत चर्चा केली असल्याची शक्यता आहे.

यावेळी अमित शाहसोबत राज्यातील महायुतीमध्ये पालकमंत्री पद, शिवसेनेची होत असलेली कोंडी आणि ऑपरेशन टायगरबाबत चर्चा झाल्याचा अंदाज आहे. शाह-शिंदे भेटीत ऑपरेशन टायगरबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून ठाकरे गटाला खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काळात ठाकरेंचे 6 खासदार फुटून शिंदे गटात अथवा भाजपमध्ये आल्यास केंद्रातील सरकार अधिक स्थिर होणार आहे. मात्र, शुक्रवारी ठाकरे गटाच्या सगळ्या खासदारांनी एकत्र पत्रकार परिषद घेत आपण ठाकरे यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ऑपरेशन टायगरबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  शिवसेनेची पाटीलकी कोणाकडे? सिब्बल यांचा अखेरचा मास्टरस्ट्रोक, हे मुद्दे खटलाच पालटतील? A टू Z माहिती

राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. त्याशिवाय, महायुतीमध्ये राष्ट्रवादी असल्याने बहुमताचा आकडा वाढला आहे. त्यामुळे सत्ता वाटपाच्या वाटाघाटातीत शिवसेनेची ताकद कमी पडल्याची चर्चा सुरू होती. मात्र, तरीदेखील एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून काही महत्त्वाची खाती खेचून घेतली आहेत.

दुसरीकडे महायुतीमध्ये शिवसेनेची कोंडी करण्याचे भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या काही निर्णयाचा फेरआढावा घेतला जात आहे. तर, दुसऱ्या बाजूला शिंदे यांची त्यांच्याच होम ग्राउंडवर कोंडी करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. ठाण्यात गणेश नाईक यांना जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपकडून गणेश नाईक यांना संपर्क मंत्रीपदाची जबाबदारी दिली. त्यातच गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता वाढली असल्याचे दिसून आले.

अधिक वाचा  महाराष्ट्रातील नव्हे, तर देशातील पहिलं ४० लाखांचे महापालिकेचे टॉयलेट स्वच्छतागृह की आलिशान घर बेडरूम हॉल अन् किचन!

रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले तर नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी दादा भुसे हे इच्छुक असताना त्यांची वर्णी लागली नाही. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदेंच्या शिवसेनेची कोंडी करण्यात येत असलयाचे दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेना ही झालेली कोंडी कशी सोडवणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.