बालभारतीची नवी पुस्तके हायटेक! क्यूआर कोडद्वारे ई-साहित्यही; ‘चाइल्ड हेल्पलाइन’ ‘टेली मानस’; या अभ्यासक्रमात झाले मोठे बदल

0

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२०च्या अनुषंगाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेली इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची नवी पाठ्यपुस्तके यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या हाती पडणार आहेत. त्यात गोष्टींच्या माध्यमातून शिक्षण, भारतीय ज्ञान प्रणाली, जीवनकौशल्ये, मूल्यशिक्षण, संविधानिक मूल्ये आणि सर्वसमावेशक शिक्षणाला विशेष प्राधान्य देण्यात आल्याची माहिती विषयतज्ज्ञांनी दिली.

पाठ्यपुस्तकांच्या आशयाची निवड विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार आणि अध्ययन निष्पत्तीच्या अनुषंगाने केली आहे. प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीलाच अध्ययन निष्पत्ती आणि त्यानुसार असलेला आशय यांचा ताळमेळ स्पष्ट करणारा तक्ता दिला आहे. शिक्षकांना अध्यापन सुलभ व्हावे, यासाठी प्रत्येक पाठ, आशय आणि उपक्रमांसोबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

अधिक वाचा  मुसळधार पावसाचा २१ जिल्ह्यांना अलर्ट; ताशी ७० च्या स्पीडने येतंय तुफान, येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस

‘एनईपी’नुसार विविध विषयांमध्ये भारतीय ज्ञान प्रणालीशी संबंधित माहितीचा समावेश केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण, सर्जनशील लेखन, संवादकौशल्य, नेतृत्व, सहकार्य आणि जिज्ञासा यांसारख्या कौशल्यांचा विकास व्हावा, यासाठी विविध उपक्रमांचा समावेश केला आहे. मूल्यांकन प्रक्रियेतही ज्ञानात्मक, आकलनात्मक, विश्लेषणात्मक, उपयोजनात्मक आणि निर्मितीआधारित स्वाध्यायांना स्थान दिले आहे. नागरिकांची मूलभूत कर्तव्ये, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक जबाबदाऱ्यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकतेसाठी स्वतंत्र आशय दिला आहे.

सर्वसमावेशक शिक्षणाच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकांतील चित्रांमध्ये विविध वेशभूषा, धर्म, समाजघटक आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करण्यात आले आहे. शालेय चित्रांत आवश्यक तेथे रॅम्प दाखवले असून, सांकेतिक भाषेच्या माध्यमातून संवाद साधणाऱ्या विद्यार्थ्यांचाही समावेश केला आहे. आशय दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुलभ आहे का, याची स्वतंत्र तज्ज्ञांकडून पडताळणी केली आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये क्यूआर कोडद्वारे ई-साहित्य उपलब्ध करून दिले जाईल. प्रत्येक पुस्तकात मानसिक आरोग्य साह्यासाठी ‘टेली मानस’ हेल्पलाइनची माहिती, बालहक्क संरक्षणासाठी राष्ट्रीय आयोगाच्या ई-बॉक्सची माहिती आणि चाइल्ड हेल्पलाइन १०९८ची माहिती देण्यात आली आहे.

अधिक वाचा  पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी की बँकेची वसुली योजना शेतकरी संघटना, विरोधी पक्षांचे आरोप काय?

नव्या पाठ्यपुस्तकांची वैशिष्ट्ये

  • ‘एनईपी’नुसार आशयाची मांडणी व अध्ययन निष्पत्तीशी सुसंगत रचना.
  • निरीक्षण, सर्जनशील लेखन, संवाद, नेतृत्व आणि सहकार्य कौशल्यांच्या विकासावर भर.
  • संविधानिक मूल्ये, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये आणि सामाजिक
  • जबाबदाऱ्यांचा समावेश.
  • लिंगसमभाव, सामाजिक मूल्ये आणि जीवनकौशल्यांची रुजवण.
  • दिव्यांग विद्याथ्यांसाठी सुलभ आशय आणि स्वतंत्र तज्ज्ञांकडून पडताळणी.
  • प्रत्येक पाठासोबत शिक्षकांसाठी मार्गदर्शक सूचना.
  • क्यूआर कोडद्वारे ई-साहित्य उपलब्ध.

‘बालभारती’च्या नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये शिक्षक, पालक किंवा विद्यार्थ्यांना त्रुटी आढळल्यास त्या कळवाव्या. आलेल्या सूचनांची तज्ज्ञ छाननी करतील. आवश्यक असल्यास पुस्तकांच्या पुढील आवृत्त्यांमध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

अधिक वाचा  पुणे विधान परिषद निवडणूक अजित पवार गटाचे उमेदवार विक्रम काकडे १५३ कोटींचे धनी; जय पवार यांनाही १० कोटींचे उधार दिले 

– संचालक, बालभारती