टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अंतिम टी 20i सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला. टीम इंडियाने विजयासह मालिकेचा शेवट केला. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची 5 सामन्यांची मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर आता उभयसंघात एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघांसाठी ही मालिका फार महत्त्वाची अशी आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने पाचव्या टी 20i सामन्यानंतर रोखठोक भूमिका मांडली. गंभीरने टीम इंडियाच्या आक्रमक क्रिकेट खेळण्याचं समर्थन केलं.
गौतम गंभीर याने काय म्हटलं?
“इंग्लंड चांगली टीम आहे. आम्ही सामना गमावू ही भीती बाळगू इच्छित नाही. आमची 250-260 धावा करण्याची इच्छा असते मात्र अनेकदा 120 धावावंर ऑलआऊट होतो, मात्र आम्ही योग्य मार्गावर आहोत. आम्ही पुढेही असंच करणार आहोत, आम्हाला निडरपणे क्रिकेट खेळावं लागेल”, असं गंभीरने पाचव्या टी 20i सामन्यातील विजयानंतर म्हटलं.
अभिषेक शर्माबाबत काय म्हटलं?
अभिषेक शर्मा याने पाचव्या टी 20i सामन्यात 54 बॉलमध्ये 13 सिक्स आणि 7 फोरसह 135 रन्स केल्या. गंभीरने अभिषेकच्या स्फोटक खेळीबाबतही प्रतिक्रिया दिली. “आम्ही अभिषेक सारख्या खेळाडूंचं समर्थन करु इच्छितो. आम्हाला या खेळाडूंवर विश्वास करावा लागेल, कारण टीममधील बहुतांश खेळाडूंचा आक्रमकपणे खेळण्यावर विश्वास आहे”, असंही गंभीरने म्हटलं.
सलामीचा सामना नागपुरात
दरम्यान बॉर्डर गावसकर ट्रॉफीनंतर रोहितसेना पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. या मालिकेतील सलामीचा सामना हा नागपुरात होणार आहे. हा सामना 6 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. “आम्ही वनडेत शक्यत तितकं आक्रमक खेळू इच्छितो. क्रिकेट चाहत्यांचं मनोरंजन करु इच्छितो”, असं गंभीरने म्हटलं.
गंभीरची रोखठोक भूमिका
वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा (बुमराहचा बॅकअप).