शेठ हिराचंद नेमचंद जैन बोर्डिंग होस्टेलच्या व्यवहाराशी संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या भागीदारीतून मी बाहेर पडल्यानंतर ११ महिन्यांनी हा व्यवहार झाल्याने या व्यवहाराशी माझा संबंध येत नाही. त्यामुळे राजू शेट्टी यांनी माहिती न घेताच चुकीचे आरोप करू नयेत. याबाबतची वस्तुस्थिती पडताळल्यास ही बाब समजेल, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी स्पष्ट केले.पुण्यात रविवारी माध्यमांशी संवाद साधताना मोहोळ म्हणाले, की ३०-३२ वर्षे सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करत असताना असे चुकीचे आरोप झाल्यास एखाद्या कार्यकर्त्याचे मनोबल खच्ची होते.






एखाद्याचे करिअर उद्ध्वस्त होऊ शकते. पुणेकरांचा खासदार असल्याने माझ्यावर होत असलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देणे मला गरजेचे वाटले, म्हणून मी माझी बाजू मांडली. जैन बोर्डिंगचे खरेदीखत, व्यवहार गोखले बिल्डर्स या बांधकाम व्यावसायिकाने केला. मी गोखलेंचा भागीदार आहे, असा आरोप माझ्यावर केला. मात्र, माझ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातही मी तसे घोषित केले होते. माझी शेती, तसेच भागीदारीतील बांधकाम व्यवसाय मी स्पष्टपणे नमूद केले होते, असे मोहोळ म्हणाले.
गोखले इस्टेट एलएलपी आणि गोखले फ्यूचर एलएलपी या दोन कंपन्यांमध्ये मी भागीदार होतो. यातील एक संस्था २०२२ आणि दुसरी २०२३ मध्ये स्थापन झाली. या दोन्ही कंपन्यांमध्ये एकही रुपयाचा व्यवसाय, व्यवहार झालेला नाही, ही माहिती कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटवरून कोणालाही पडताळून पाहता येईल. केंद्रात मंत्री झाल्यानंतर नोकरी करता येत नाही, भागीदारी करता येत नाही. त्यानुसार या दोन्ही भागीदारी संस्थांमधून मी २५ नोव्हेंबर २०२४ रोजी राजीनामा देत बाहेर पडलो, असे मोहोळ यांनी सांगितले.
जैन बोर्डिंग ट्रस्टची बैठक १६ डिसेंबर २०२४ रोजी झाली. त्यात बोर्डिंगच्या पुनर्विकासासाठी विकसकाला देण्याचा निर्णय घेतला. २० डिसेंबर २०२४ रोजी त्यांनी पुणे आणि मुंबईतील काही वर्तमानपत्रांत निविदा प्रसिद्ध केली. पुढे गोखले बिल्डर्सने आठ ऑक्टोबर २०२५ रोजी जैन बोर्डिंग ट्रस्टसोबत खरेदीखत केले. मी या भागीदारी संस्थांमधून बाहेर पडल्यानंतर ११ महिन्यांनी हा व्यवहार झाला. मग यात माझा संबंध येतोच कुठे, असा सवालही मोहोळ यांनी केला.
शेट्टी यांनी नुरा कुस्ती खेळू नये..
राजू शेट्टी यांना चुकीची माहिती देण्यात आली. त्यांनी शहानिशा न करताच बेछूट आरोप केले. त्यांनी मला विचारले असते, तर मी त्यांना वस्तुस्थिती कागदपत्रांसह दाखवली असती. त्यांच्यावर माझा आक्षेप नाही. त्यांनी खरी कुस्ती खेळावी, नुरा कुस्ती नव्हे. ते मला नुरा कुस्तीचे खेळाडू वाटतात. दोन्हींतला फरक पुणेकर आणि कोल्हापूरकर चांगलाच जाणतात, असा उपरोधिक टोलाही मोहोळ यांनी लगावला.
बिळातले उंदीर बाहेर..
शेट्टींनी आरोप केल्यानंतर काही बिळात लपलेले उंदीर बाहेर येऊन बोलू लागले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या वेळी या नेत्याने सगळ्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. मी तेव्हाही आणि आताही एकही शब्द बोलणार नाही. ही व्यक्ती वैफल्यग्रस्त आणि सगळीकडून नाकारलेली आहे, अशा शब्दांत मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका केली. महायुतीत आमच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका स्पष्ट आहे. नेत्यांचे आदेश आम्ही ऐकतो. धंगेकर हा काय प्रकार आहे, त्यांचे त्यांनाच माहीत. याआधीही त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केले; पण एकही कागद दाखवला नाही, असे मोहोळ म्हणाले.
युती आणि खेळ वेगळा विषय..
ऑलिंपिक समितीच्या निवडणुकीत मी, उपमुख्यमंत्री अजित पवारही आहेत. राज्यातील युती आणि खेळ हा वेगळा विषय आहे. मात्र, ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात होईल, तसेच पुण्यात गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही, त्याबाबत पोलीस आयुक्तांशी सातत्याने संपर्कात असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले.










