आगामी विधानसभा निवडणुकांच्या रूपाने मी सातव्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरा जात आहे. गेल्या सहा निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकीतही मला आशीर्वाद द्या. तुमचा भाऊ आणि मुलगा समजून ओट्यात घ्या आणि मायेची उब द्या’, असे भावनिक आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ‘निवडणुकीच्या तयारीची सुरुवात म्हणून गावागावांत बाड्या-वस्त्यांवर जनतेपर्यंत पोहोचा,’ असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.






कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुश्रीफा बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील होते. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘गेली ४० वर्षे सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये जनतेने मला भरभरून दिले आहे. त्यापैकी तुम्ही मला २५ वर्षे आमदारकी दिली, या काळात ११ वर्षे मंत्रिपदी राहिलो. आपला आमदार भेटावा, ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा असते. संपर्कामध्ये कधीही कमतरता ठेवली नाही.
सामान्यातील सामान्य अगदी एक जरी माणूस येऊन म्हणाला की, मी घरात असून भेटलो नाही किंवा फोन उचलला नाही तर या निवडणुकीचा अर्ज सुद्धा भरणार नाही. जनतेने मला जी संधी दिली त्यामध्ये व्यक्तिगत कामे व योजना प्रभावीपणे राबविल्या. मी संपूर्ण आयुष्य गोरगरीब सर्वसामान्य जनतेसाठी खर्ची घातली आहे. येत्या विधानसभेला फक्त शंभर दिवस शिल्लक राहिले आहेत. या शंभर दिवसांत इष्र्येने पेटून उठा, जनतेच्या घरोघरी पोहोचा. परगावच्या मतदानाची यादी तयार करा. हे शंभर दिवस तुम्ही माझ्यासाठी देणार असाल तरच फॉर्म भरूया. विधानसभा मतदारसंघातील बेरोजगारी हटविण्यासाठी कायमच प्रयत्नशील राहिलो. येत्या पाच वर्षात एक मोठा कारखाना उभा करू, ज्यामध्ये दोन हजारांहून अधिक बेरोजगारांना रोजगार मिळेल.’
भैया माने म्हणाले, ‘मुश्रीफ यांच्यासारखे नेतृत्व लाभावे, ही आपणा सर्वांची पुण्याई आहे. या मेळाव्याचे नियोजन करीत असताना काल रात्रीपासूनच वा हंगामाची सुरुवात जोरदार पावसाने झाली आहे. मुश्रीफ यांच्या विधानसभा निवडणुकीतही असाच मतांचा पाऊस पाडूया. यावेळी गडहिंग्लजचे माजी उपनगराध्यक्ष किरण कदम, चंद्रकांत पाटील, विजय काळे आदींची भाषणे झाली. येथील देवराज बेळकट्टी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी समरजितसिंह घाटगे यांच्या गटातून मुश्रीफ गटांमध्ये प्रवेश केला. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.











