ICC कात्रीत सेमी फायनलची तिकीट विक्री सुरु, पण होणार कुठे? भारत की श्रीलंका ठिकाण ठरेनाच

0

वर्ल्ड कप टी-२० क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य तसेच अंतिम फेरीच्या लढतीची तिकीटविक्री सुरू झाली असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केले. मात्र सामने नेमके कोठे होणार हे अद्याप निश्चित नाही, या सामन्यांसाठी कोलकाता, अहमदाबाद, मुंबई आणि कोलंबोची निवड झाली आहे. मात्र मुंबईतील उपांत्य लढत सोडल्यास काहीही निश्चित नाही.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षांमुळे स्पर्धेचा कार्यक्रमच निश्चित नाही. उपांत्य फेरीसाठी मुंबई, कोलकाता आणि कोलंबोची निवड झाली आहे. मुंबईतील लढत निश्चित आहे, पण कोलंबो किंवा कोलकाता यापैकी एका ठिकाणीच उपांत्य फेरीची लढत होईल. त्याचवेळी कोलंबो आणि अहमदाबाद यापैकी एकाच शहरास अंतिम लढत घेण्याचा मान मिळणार आहे. आयसीसीने मात्र सर्व ठिकाणची तिकीटविक्री सुरू केली आहे. त्याचवेळी संबंधित ठिकाणी सामना न झाल्यास तिकीटाचा पूर्ण परतावा देण्याची ग्वाही दिली आहे.

अधिक वाचा  यंदा ‌’अल निनो‌’मुळे खडकवासला धरणातील राखीव पाण्याबाबत हा निर्णय; 1 कोटी नागरिकांसाठी जलसंपदा विभागाची कठोर उपाययोजना

उपांत्य फेरीतील कोलकाता की कोलंबो या निर्णयात अनेक गुंतागुंत आहे. पाकिस्तानचा संघ सुपर ८ साखळीतच बाद झाल्यास उपांत्य लढती भारतातच (मुंबई आणि कोलकाता) होतील असे सुरुवातीस गणित होते. मात्र आता श्रीलंकेची उपांत्य फेरीची लढत भारताविरुद्ध नसल्यास त्यांचा सामनाही कोलंबोही घेण्याचे ठरले आहे. उपांत्य फेरीतील संघ निश्चित नसल्यामुळे ठिकाण अनिश्चित आहे. एवढेच नव्हे तर भारताने उपांत्य फेरी गाठल्यासच त्यांचा सामना मुंबईत होण्याचीही खात्री नाही.

चाहत्यांवर अन्यायच

चाहत्यांनी कोलकाता, अहमदाबाद किंवा कोलंबोत उपांत्य तसेच अंतिम फेरीचे तिकीट आरक्षित करुन त्यादृष्टीने आपल्या प्रवासाची योजना आखल्यास त्यांचेच नुकसान होऊ शकते. आयसीसीने केवळ तिकीटाची रक्कम परत देणार असल्याचे सांगितले आहे. चाहत्यांना मात्र प्रवास तसेच हॉटेल आरक्षण रद्द केल्याचाही फटका बसेल.

अधिक वाचा  समुद्रात चीनचा मोठा खेळ अमेरिकेच्या नाकावर टिच्चून ‘रिच स्टारी’ होर्मुज पार; अमेरिकेचे हे सर्वात मोठे अपयश

नेमका पेच काय?

  • आयसीसीनुसार पहिली उपांत्य लढत फ्लोटिंग. ही लढत प्रेमदासा स्टेडियम किंवा ईडन गार्डनवर.
  • या फेरीतील संघानुसार ठिकाण ठरणार
  • दुसरी उपांत्य लढत वानखेडे स्टेडियमवरच.
  • पाकिस्तान उपांत्य फेरीस पात्र ठरल्यास त्यांची उपांत्य लढत कोलंबोत ४ मार्चला
  • श्रीलंका उपांत्य फेरीस पात्र ठरले आणि त्यांचा प्रतिस्पर्धी भारतीय संघ नसेल तर सामना कोलंबोत
  • भारत-श्रीलंका उपांत्य लढत निश्चित झाल्यास हा सामना उपांत्य लढत एक धरण्यात येईल. हा सामना कोलकाता येथे
  • स्पर्धेची अंतिम लढत अहमदाबादला, मात्र पाक अंतिम फेरीस पात्र ठरल्यास विजेतेपदाची लढत कोलंबोत