राज्यात विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणुका होणार आहे. अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीसाठी महायुतीचा अखेर फॉर्मुला ठरल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. सुरवातीला 12 जागांवर दावा केलेल्या भाजपा सर्वाधिक ११ जागा लढवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. तर शिवसेनेच्या वाट्याला ४ आणि राष्ट्रवादीच्या पदरात २ जागा पडल्याचं समजतेय. लवकरच यावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल.






महायुतीच्या जागावाटपाचा तिढा दिल्लीत सुटला. एकनाथ शिंदे यांची दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते उपस्थित होते. या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्मुला ठरल्याची माहिती मिळाली. परभणी, कोकण, ठाण्याची जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा अद्याप सुटला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रायगड आणि पुण्याची जागा सुटल्याची माहिती समोर आली आहे. रायगडमधून प्रदेशअध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मुलाचे अनिकेत तटकरे यांचे नाव राष्ट्रवादीकडून आघाडीवर आहे. तर पुण्यात यंदा शहर अन् ग्रामीण अशी चढाओढ असून ग्रामीण भागातील ४ ते ५ जण इच्छूक असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुणाला तिकीट मिळणार, याकडे कार्यकर्त्यांच्या नजरा खिळल्या आहेत. पुढच्या २४ तासांमध्ये जागा वाटपाचा अधिकृत फॉर्म्युला जाहीर होणार आहे. येत्या २ ते ३ दिवसांमध्ये उमेदवारांची नावं देखील जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
राज्यातील विधानपरिषदेच्या १७ जागांसाठीच्या निवडणुकीसाठी २५ मे रोजी अधिसूचना जाहीर करण्यात आली. या निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर मतमोजणी २२ जून रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १ जून आहे. अनेक राजकीय पक्षांनी अर्ज भरण्यास सुरूवात केली आहे. अर्जाची छाननी दुसऱ्या दिवशी म्हणजे २ जूनला होणार आहे. तर अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख ४ जून आहे.
कुणाला कुठल्या जागी संधी मिळणार?
भाजप –
नाशिक, वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली, अमरावती, नागपूर, सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ- वाशिम, भंडारा- गोंदिया
राष्ट्रवादी काँग्रेस –
पुणे, कोकण
शिवसेना –
ठाणे, परभणी- हिंगोली, यवतमाळ- वाशिम,छत्रपती संभाजीनगर- जालना













