स्थायी समिती विधान परिषद आचारसंहितेतून विशेष परवानगीनंतर आक्रमक; या महत्त्वाच्या प्रश्नांसाठी अधिकाऱ्यांची घेतली शाळा

0

पुणे विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेतील बैठका ठप्प झाल्या होत्या. मात्र, शहरातील तातडीच्या नागरी प्रश्नांबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेला बैठका घेण्यास विशेष परवानगी दिल्यानंतर बुधवारी स्थायी समितीची बैठक पार पडली.बैठकीला सुरुवात होताच नगरसेवकांनी पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा, सांडपाणी आणि नालेसफाईच्या मुद्द्यांवर प्रशासनाला जाब विचारला.

शहरातील अनेक भागांत दूषित आणि गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी सदस्यांनी आक्रमकपणे मांडल्या. उपनगरांमधील सोसायट्यांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप करण्यात आला. जलवाहिन्यांची देखभाल आणि दुरुस्ती वेळेत होत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सदस्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

अधिक वाचा  पंजाबमध्ये भाजपचा दणदणीत पराभव! ‘आप’चा 900 जागांवर विजय, काँग्रेस ही दुसरे स्थान मिळवत समाधानी?

शहरातील अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याचा मुद्दाही बैठकीत गाजला. काही परिसरांमध्ये नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असून, नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. पावसाळा तोंडावर असतानाही नालेसफाई आणि सांडपाणी दुरुस्तीची कामे अपूर्ण असल्याबद्दल सदस्यांनी प्रशासनाची कोंडी केली.

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकांमध्ये चर्चा करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार आज बैठकीत चर्चा झाली. त्यामध्ये पावसाळ्यापूर्वी सर्व प्रतिबंधात्मक कामे पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नगरसेवकांनी शहरातील अन्य प्रश्नांवर चर्चा केली.