विधानसभेच्या निकालानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, या नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण असणार आणि या मंत्रिमंडळात कोणत्या आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय भाजपचे केंद्रीय नेते दिल्लीतून घेणार असल्याचं महायुतीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे पुढील मुख्यमंत्री कोण असणार? याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. मात्र, शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री रहावेत अशी मागणी केली आहे. तर भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे.






शिवाय फडणवीस यांच्या नावाला जवळपास 178 आमदारांनी पाठिंबा दिल्याची सुत्रांची माहिती आहे. एकीकडे मुख्यमंत्रिपद कोणाकडे जाणार याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे नव्या सरकारमध्ये कोणत्या आमदारांना मंत्रीपद दिलं जाणार याबाबत महायुतीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, नव्या सरकारमधील मंत्रिमंडळात भाजपला 21, शिंदेंच्या शिवसेनेला 12 तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं असा हा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. तसंच आमदारांना मंत्रीपदे देताना आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून दिली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
महायुतीच्या सरकारमध्ये कोणत्या नेत्यांची मंत्रीपदी वर्णी लागणार याची संभाव्य यादी समोर आली आहे. त्यानुसार भाजपकडून आमदार चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, नितेश राणे, सुधीर मुवगंटीवार, संजय राठोड, आशिष शेलार यांच्या नावाचा समावेश असू शकतो. तर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक तर मागील अनेक दिवसांपासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असणारे भरत गोगावले यांच्यासह उदय सामंत, दीपक केसरकर, दादा भुसे, यांच्या नावाचा समावेश असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. मात्र, नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपर्यंत शिंदे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहणार आहेत. तर नव्या सरकारचा शपथविधी 2 डिसेंबरला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर राज्यातील मुख्यमंत्री ठरवण्यासाठी दिल्लीत खलबत सुरू असून गृहमंत्री अमित शहा हे आज रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.











