जालना : मनोज जरांगे पाटलांची ईडीमार्फत चौकशी करा, अशी मागणी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केले आहे. एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या पाच दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटीत पुन्हा उपोषणाला बसले आहेत. तर तिथून काही अंतरावरच ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे ओबीसी बचाव आरक्षणासाठी उपोषण करत आहे. आज नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या जोरदार निशाणा साधला.






नवनाथ वाघमारे म्हणाले की, मनोज जरांगेच्या आंदोलनामधून दहशत माजवण्याचं काम आणि ओबीसींवर दबाव टाकण्याचा काम सुरू आहे. मनोज जरांगे यांनी अभ्यास करावा. रात्री येऊन जर मंत्री भेटत असतील तर त्यांचं काम काय आहे? रात्रीच खेळ चाले… रात्रीत बंद दाराआड काय चालतं? शंभर खोक्यांचा अपहार झाल्याचे त्यांनी मान्य केले आहे, याबाबत राज्य सरकारने चौकशी केली पाहिजे.
जरांगेंची ईडीमार्फत चौकशी करा
केंद्र आणि राज्य सरकारला विनंती आहे की, जरांगे यांची ईडीमार्फत चौकशी झाली पाहिजे. आमच्या मागे कोण शासकीय आहे आम्ही वारंवार सांगतो जरांगे यांच्या मागे मुख्यमंत्री आणि तुतारीवाल्याचा हात आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. मुख्यमंत्र्यांना कुठलाच अभ्यास नाही. मुख्यमंत्र्यांनी जे जीआर काढले ते कोर्टत टिकले पाहिजे ना. तुतारीच्या पक्षामध्ये मी स्वतः होतो, पवार साहेबांना घरातच सगळे पद लागत असतात. मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असताना जाणवलं की, लोकप्रतिनिधींनी कारखान्याहून अंतरवलीत वायर पुरवलं. जरांगे यांचे उपोषणा उठल्यानंतर बसवण्याचं काम या लोकप्रतिनिधी आणि रोहित पवार यांनी केले असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
लक्ष्मण हाकेंचा मुख्यमंत्र्यांवर आरोप
लक्ष्मण हाके यांनीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर माझा आरोप आहे की, तुम्ही घटनेची द्रोह करत आहात, घटनेची तत्व तुम्ही पाळत नाहीत. ओबीसीचे बांधव यांना फक्त शाखा प्रमुखांसाठी लागतात. विधानसभेत पाठवण्यासाठी मात्र यांना दारूचे गुत्तेदार दोन नंबरचे धंदे करणाऱ्या माणसांना आमदार, खासदारकीचे तिकिटे देतात आणि सामाजिक न्यायाची तुम्ही काय भाषा बोलणार? असे बोचरी टीका लक्ष्मण हाके यांनी यावेळी केली.











