‘मी महाराष्ट्रातलं चित्र बदलून दाखवीन…’, शरद पवारांनी पुन्हा ठोकला शड्डू! पुन्हा महायुतीला दिलं मोठं आव्हान

0

लोकसभा निवडणूक 2024 साठी राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे अत्यंत जोमाने प्रचार करत आहेत. पक्षात फूट पडलेली असतानाही शरद पवार हे त्याचा फारसा विचार न करता आपले उमेदवार पुन्हा कसे निवडून येतील याची रणनिती सातत्याने आखताना दिसत आहेत. अशातच शरद पवारांनी पुन्हा एकदा शड्डू ठोकला आहे. 2019 विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांना फारसं अनुकूल असं वातावरण नव्हतं. मात्र, शरद पवारांनी केलेल्या झंझावाती प्रचारामुळे जवळजवळ दोन्ही पक्षांच्या मिळून 100 च्या जवळपास जागा निवडून आल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेच्या मदतीने त्यांना सत्ताही मिळाली होती.

दरम्यान, अडीच वर्षानंतर दोन पक्षांमध्ये पडलेली फूट यामुळे राज्यातील राजकारण बदलून गेलं आहे. असं असताना आता पुन्हा एकदा शरद पवार हे नव्या उमेदीने भाजप आणि महायुतीला आव्हान देण्यासाठी रिंगणात उतरले आहेत.

 ‘सगळ्यांचं आता तुतारीकडे लक्ष आलेलं आहे. या सगळ्यांच्या सामुदायिक पाठिंब्याने महाराष्ट्र राज्य हे आपण बदलू. नुसती केंद्राची निवडणूक नाही, मी तुम्हाला सांगतो ही निवडणूक तुम्ही करा याच्यामध्ये तुतारी, कॉंग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंची शिवसेना या सगळ्यांना विजयी करा. मी महाराष्ट्रातलं चित्र बदलून दाखवीन. महाराष्ट्राचा बदल करून दाखवीन आणि ते व्हायला लोकांची अपेक्षा आहे.’ असं विधान करत शरद पवार यांनी एकप्रकारे पुन्हा एकदा शड्डू ठोकला आहे.

‘आज सत्तेचा गैरवापर होतोय. मोदी साहेबांच्या मनासारखं झालं तर ठीक, त्यांच्या मनासारखं नाही म्हटलं की सत्तेचा गैरवापर. मगाशी मी बोलताना सांगितलं एके काळी मोदी साहेब हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. आणि मी केंद्राचा कृषी मंत्री होतो. माझं धोरण असायचं कुठलंही राज्य, कोणता मुख्यमंत्री आहे ते बघायचं नाही. त्या राज्याच्या जनतेचे प्रश्न सोडवायचे. गुजरातचे अनेक प्रश्न मी सोडवले, त्याचं एक समाधान दिसलं. एक दिवशी मोदीसाहेबांनी माल कळवलं मला बारामतीला यायचय. या म्हटलं. ते आले, बारामतीला संस्था बघितल्या. एक ठिकाणी भाषण केलं, भाषणात त्यांनी सांगितलं, मी राजकारणात जो आलोय आणि यशस्वी झालोय मी पवार साहेबांचं बोट धरून आलो. तुम्ही कधी ऐकलं होतं का? हे भाषण त्यांनी केलं होतं बारामतीला.’

अधिक वाचा  कॅबिनेट मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड समोर, सोशल मिडियाचा सर्वाधिक चांगला वापर कोणी केला? मोदी कितव्या क्रमांकावर?

‘आता आनंद आहे की निदान आपल्या बरोबर राहणारा आपला एक ज्येष्ठ नेता देशाचा प्रधानमंत्री झाला. कोणताही राजकीय संघर्ष आमचा नव्हता. धोरणं चुकीची होती त्याच्याबद्दलचा आमचा विचार होता. सत्तेचा गैर वापर सुरू झाला. त्यांच्या मनाविरुद्ध एखादं राज्य वागत असेल तर ते त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करतात. झारखंड नावाचं राज्य आहे, आदिवासींच राज्य आहे. तिथे आदिवासी मुख्यमंत्री आहे. केंद्र सरकारचं धोरण चुकीचं आहे असं त्यांनी भाषण केलं. आज झारखंडचा मुख्यमंत्री तुरुंगात टाकलाय.’

‘राज्याचा मुख्यमंत्री त्याला जेलमध्ये टाकलाय. दिल्ली ही देशाची राजधानी. दिल्लीचा मुख्यमंत्री त्यांचं नाव अरविंद केजरीवाल आणि अरविंद केजरीवाल अतिशय चांगलं राज्य चालवतात. तिथल्या शाळा, हॉस्पिटल, दवाखाने हे बघायला देशाच्या बाहेरून लोक येत असतात. एक स्वच्छ काम करणारा नेता म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या विरुद्ध धोरण असं घेतलं, टिका केली. आज अरविंद केजरीवालला जेलमध्ये टाकलं, त्यांच्या खासदारांना जेलमध्ये टाकलं. त्यांच्या ४ मंत्र्यांना जेलमध्ये टाकलं. ही काही लोकशाही नाही, ही हुकुमशाही आहे. आणि आज त्या हुकुमशाहीच्या रस्त्याने भाजपचं सरकार चाललेलं आहे. या देशाची घटना जी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांना दिली.’

अधिक वाचा  पुण्यात ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, लाईव्ह कॉन्सर्ट अन् राहुल गांधींचा थेट संवाद

‘त्या घटनेवर हल्ला होणार आहे. आणि एकदा घटनेवर हल्ला केला, तर तुमचे माझे सगळ्यांचे अधिकार हे उद्ध्वस्त होतील. आणि जे तुमचे आणि माझे अधिकार हे उद्ध्वस्त करण्याचं काम करतात त्यांच्या हातात आम्हाला सत्ता द्यायची नाही. हा निकाल या निवडणुकीत घ्यायचा आहे. त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. आज तुमच्या पुढे राष्ट्रवादी कॉंग्रेस असेल, कॉंग्रेस पक्ष असेल, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना असेल, इतर मित्र पक्ष असतील या सगळ्यांनी मिळून निवडणूक एकत्र लढवायचा निकाल घेतला. सगळ्या विषयात आमचं एकमत झालं.’

‘उद्या मी मुंबईला जाऊन मी कॉंग्रेस पक्षाचे नेते, शिवसेनेचे नेते सबंध महाराष्ट्राला ४८ लोकांची यादी आमचे उमेदवार कोण आहेत हे जाहीर करणार आहे. आणि ते एक मताने कसलेही मतभेद न ठेवता एका विचाराने आम्ही जाहीर करणार आहोत. आणि त्या दृष्टीने बारामती लोकसभामध्ये आपल्या सगळ्यांचे उमेदवार सुप्रिया तुम्हां सगळ्यांना माहिती आहे. याच्या आधी तुम्ही यांना निवडून दिलं. निवडून देऊन नुसते बसले नाही, हिंदुस्थानच्या पार्लमेंट मध्ये पहिले दोन लोक, ज्यांना जास्तीत जास्त गुण मिळाले जास्तीत जास्त हजेरी लागली, जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न मांडले. लोकांचे प्रश्न मांडण्यात मतदार संघाशी संपर्क ठेवला. आणि कुठलंही चुकीचं काम नाही, एक व्यक्तीसुद्धा देशात त्यांच्यावर आरोप करू शकत नाही.’

अधिक वाचा  पुण्यात घरांच्या विक्रीत तब्बल २१ टक्के घट; देशातील प्रमुख शहरांत काय आहे स्थिती? धक्कादायक अहवाल समोर

‘कुणाच्या नव्या पैशाला हा उमेदवार शिवलाय असं कुणीही म्हणू शकत नाही. इतका स्वच्छ कारभार त्यांनी याठिकाणी केलेला आहे. आणि ती उमेदवारी आज तुमच्या सर्वांच्या समोर आलेली आहे. या वेळेला खूण बदलली खूण बदलायचं काय कारण नव्हतं. पण रोजच्या प्रमाणे लोकांनी गमती केल्या त्यामुळे ती खूण बदलायची वेळ आलेली आहे. आणि खूण बदलली ती आता तुतारीची खूण आहे. आणि मगाशी मी सांगितल ही वेगळी खूण असली तरी खेड्यापाड्यात पोहचते असं दिसतंय.’

‘सगळ्यांचं आता तुतारीकडे लक्ष आलेलं आहे. या सगळ्यांच्या सामुदायिक पाठिंब्याने महाराष्ट्र राज्य हे आपण बदलू. नुसती केंद्राची निवडणूक नाही, मी तुम्हाला सांगतो ही निवडणूक तुम्ही करा याच्यामध्ये तुतारी, कॉंग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंची शिवसेना या सगळ्यांना विजयी करा. मी महाराष्ट्रातलं चित्र बदलून दाखवीन. महाराष्ट्राचा बदल करून दाखवीन आणि ते व्हायला लोकांची अपेक्षा आहे. इतर काही प्रश्न असतात, शेतीमालाच्या किमती, पाण्याचे प्रश्न आहेत. आणि या सगळ्या गोष्टीवर इथे आणखी काही करायची गरज आहे.’

‘काल परवा भाषणामध्ये ऐकलं की या वयात सुद्धा तुम्ही हिंडताय. आणि हे असं म्हटलेलं मला पटत नाही. ते म्हणतात या वयात तुम्ही फिरता. मी काय म्हातारा झालोय? एकदा काम करायचं ठरवलं आणि जनतेचा पाठिंबा असला की त्या पाठिंब्याने यश खेचून आणू. एवढीच खात्री याठिकाणी देतो. आणि तुम्हा सगळ्यांची साथ सुप्रियाला मिळेल असा विश्वास व्यक्त करतो.’ असं शरद पवार हे आपल्या भाषणात म्हणाले.