इंदापूर – इंदापूर येथील पुणे सोलापूर महामार्गावरील बाह्यवळण मार्गावरील हॉटेल जगदंबा येथे झालेल्या खून प्रकरण पूर्ववैमनस्याच्या टोळी युद्धातून घडले असून, मयत सराईत गुन्हेगार, कोयता गँगचा म्होरक्या अविनाश धनवे याचा कोयत्यानेच अंत केला गेला. दरम्यान याबाबत मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून 10 जणांविरोधात इंदापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






याबाबत पुजा अविनाश धनवे (वय-23 वर्षे, व्यवसाय, घरकाम रा. च-होली बुद्रुक, वडमुखवाडी, आळंदी रोड, ता. हवेली, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुशाल तापकिर, विशाल तापकिर (दोघे रा. आळंदी, ता. हवेली), मयुर पाटोळे (रा. वडमुखवाडी, आळंदी, ता. हवेली), राहुल चव्हाण, देवा सुतार, मयुर मानकर, शिवा बेडेकर, प्रकाश उर्फ पप्पु बनकर (सर्व रा. आळंदी, ता. हवेली), सतिष पांडे, प्रणिल उर्फ बंटी मोहन काकडे (रा. फलटण, ता. सातारा) यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार शनिवार (ता.16) रात्रौ 8 वाजताच्या दरम्यान हॉटेल जगदंब हॉटेल येथे फिर्यादीचे पती अविनाश बाळु धनवे (वय-31 वर्षे च-होली बुद्रुक, वडमुखवाडी, आळंदी रोड ता. हवेली) याचा पूर्व वैमनस्याचे कारणावरून खुशाल तापकिर, विशाल तापकिर दोन्ही (रा. आळंदी, ता. हवेली जि. पुणे) यांचे सांगण्यावरून मयुर पाटोळे, राहुल चव्हाण, देवा सुतार, मयुर मानकर, शिवा बेंडेकर प्रकाश उर्फ पप्पु बनकर यांनी एकत्र जमुन फिर्यादीचे पती अविनाश धनवे यांचे वाढत चालेले वर्चस्व सहन न झाल्याने जगदंब हॉटेल, इंदापुर येथे पिस्टलने फायर करून व कोयत्याने वार करून जीवे ठार मारले.
तर इतर दोन इसमांपैकी एक सतिष पांडे असल्याचे वाटत आहे. तसेच प्रणिल उर्फ बंटी मोहन काकडे (रा. फलटण, ता. सातारा) याने पती अविनाश धनवे यांना मारण्यासाठी आग्रहाने घरून बोलावुन माहिती मारेक-यांना दिल्याचा संशय बंटी काकडे याचेवर आहे. म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गुन्हा घडल्यानंतर काही वेळातच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी घटनास्थळाला भेट देत जिल्ह्याच्या विविध भागात नाकाबंदीच्या सूचना करीत तपासाबाबत मार्गदर्शन केले.या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे करीत आहेत.
कोयता गँगच्या म्होरक्याचा कोयत्यानेच अखेर..
दरम्यान गेल्या काही वर्षापासून पुणे, पिंपरी चिंचवड शहरासहलगतच्या काही भागांमध्ये कोयता गँगची दहशत आहे. यामुळे याभागात टोळ्या तयार झाल्या आहेत. या टोळ्यांचे वाढत चाललेले वर्चस्व आणि सुरू असलेल्या श्रेयवाद यावरूनच इंदापूर येथे आळंदीच्या सराईत गुन्हेगाराची हत्या झाली असून, कोयता गॅंगचा मोरक्या असलेल्या अविनाशचा कोयत्यानेच अंत केल्याने युवकांनी अशा घटनांतून बोध घेणे आवश्यक आहे.
एक महिन्यापूर्वीच जेलमधून बाहेर..
चार वर्षापुर्वी अविनाश धनवे व गावातील खुशाल तापकीर यांचेत किरकोळ वाद झाला होता. दरम्यान रॉयल हॉटेल, बेली घाट येथे खुशाल तापकिर व त्याचे साथीदार यांनी अविनाश याचेवर फायरिंग केली होती. तसेच खुन्नस काढुन खुशाल तापकिर याचा मित्र फड व रमेश चव्हाण यांनी अविनाश यास शिविगाळ करून मारहाण केली होती. सदर प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्यात अविनाश धनवे याचेवर मोक्का अंतर्गत कारवाई होउन तो चार वर्षे येरवडा जेलमध्ये होता. त्यानंतर एक महिन्यापुर्वी जामिनावर बाहेर आल्यावर खुशाल तापकीर हा त्याला जिवंत ठेवणार नाही, त्याला मारहाण करण्याच्या धमक्या देत होता. असेही फिर्यादी मध्ये नमूद केले आहे.











