जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पूर्ण तयारीने हा हल्ला केला. हा संपूर्ण हल्ला मुंबईवरील 26/11 हल्ल्याच्या धर्तीवर नियोजित होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पहलगामच्या जंगलात 5 ते 6 पाकिस्तानी दहशतवादी लपून बसले होते. स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांनी परिसरात फिरून रेकी केली आणि योग्य वेळ साधत निष्पाप लोकांवर हल्ला केला.






हल्ल्यापूर्वी केलेली हायटेक तयारी…
गुप्तचर संस्थांनुसार, दहशतवाद्यांनी आपल्या बॅगांमध्ये सुकामेवा, औषधे आणि संपर्क साधने आणली होती. यावरून असे दिसून येते की, दहशतवादी हे एका दीर्घ कारवाईच्या तयारीने आले होते.
पहलगाममधील बेसरन हा परिसर चारी बाजूने डोंगरांनी वेढलेला आहे. ज्याच्या मधोमध एक प्रचंड मोठं गवताळ मैदान आहे. या भागात फक्त पायी किंवा घोड्यावरून पोहोचता येतं. पहलगाम शहर ते बेसरन हे अंतर 6 किमी आहे. हा संपूर्ण परिसर पर्वत आणि घनदाट जंगलांनी वेढलेला आहे आणि खूप उंचावर आहे. येथे वाहनेही पोहोचू शकत नाहीत. हे पर्यटक आणि ट्रेकर्सचे आवडते ठिकाण आहे. या भागात सुरक्षा दलांची तैनाती नाही.
AK-47 मधून सतत गोळ्यांचा वर्षाव
हल्ल्यादरम्यान तीन ते चार दहशतवाद्यांनी AK-47 ने सतत गोळीबार केला. यातील दोन दहशतवादी पश्तो भाषेत बोलत होते, ज्यावरून ते पाकिस्तानी असल्याची पुष्टी होते. त्यांच्यासोबत दोन स्थानिक दहशतवाद्यांचीही ओळख पटली आहे. त्यांची नावे आदिल अहमद ठाकूर (गुरी, बिजबेहरा) आणि आसिफ शेख (मोंघामा, त्राल) अशी देण्यात आली आहेत.
पाहा हल्ल्यातील मृत आणि जखमींची संपूर्ण यादी


या हल्यात जे 26 जण मृत झाले आहेत तर 17 जण हे जखमी झाले आहेत. त्यांची आता संपूर्ण यादीच समोर आली आहे.
दहशतवाद्यांनी हल्ला कॅमेऱ्यात केला रेकॉर्ड
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक किंवा दोन दहशतवाद्यांनी बॉडी कॅमेरे देखील घातले होते, ज्याद्वारे त्यांनी संपूर्ण हल्ल्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आहे. या फुटेजचा वापर दहशतवादी प्रचारासाठीही केला जाऊ शकतो
पर्यटकांनी सांगितले की, जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा तिथे कोणत्याही सुरक्षा दलाच्या तुकड्या हजर नव्हत्या. त्यामुळे हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना घनदाट जंगलात पळून जातं आलं. हत्याकांडानंतर दहशतवाद्यांनी जगंलात आसरा घेतला असल्याचं बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी परिसरातील मोबाइल नेटवर्क आणि सुरक्षा दलांची बॅकअप टीम कधीपर्यंत येऊ शकते या गोष्टी लक्षात घेऊनच या संपूर्ण हल्ल्याचं नियोजन करण्यात आलं होतं.











