पुणे – पुणे जिल्ह्यात दरवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस लांबला आहे. यामुळे भाताच्या रोपवाटिका टाकण्यास नेहमीपेक्षा उशीर झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांनी पावसाची वाट बघून बघून आज ना उद्या पाऊस पडेल, या आशेवर दोन आठवड्यांपूर्वी कोरड्या जमिनीतच भाताच्या रोपवाटिका टाकल्या.पण त्या आता पावसाअभावी करपू लागल्या आहेत. आता पाऊस पडला तरी, ही भातरोपे पुनर्जीवित होण्यास आणि भात लावणी करण्यास नेहमीच्या तुलनेत उशीर होणार आहे. याचा फटका भात उत्पादनाला बसणार आहे. शिवाय डाळवर्गीय पिके घेता येणार नसल्याने भविष्यात जिल्ह्यातील डाळींच्या उत्पादनात घट होणार आहे. परिणामी डाळी महागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.






मागील सुमारे तीन आठवड्यांपासून आजतागायत अद्याप पाऊस पडलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात जेमतेम केवळ सहा ते सात टक्केच पेरण्या झाल्या आहेत. पेरण्या झालेली पिकेही पावसाअभावी करपू लागली आहेत. यामुळे जिल्ह्यावर यंदा कोरड्या दुष्काळाचे सावट पसरू लागले आहे. जून महिना संपत आला तरीही, अद्याप जिल्ह्यात खरीप पेरण्यांसाठी पुरेसा पाऊस पडू शकलेला नाही. याचा थेट परिणाम खरीप पेरण्यांवर झाला आहे. जिल्ह्यातील काही भागात मे महिन्याच्या मध्यात एक पाऊस झाला होता. या एकाच पावसावर काही पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यानंतर पाऊस झालाच नसल्याने ही पिकेही पावसाअभावी जळू लागली आहेत.
पुणे जिल्ह्याचे उसाचे क्षेत्र वगळता खरीप पिकाचे एकूण सरासरी क्षेत्र हे १ लाख ९५ हजार हेक्टर इतके आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात भात, खरीप ज्वारी, बाजरी, रागी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, कारळे, सूर्यफूल, सोयाबीन आदी प्रमुख पिके घेतली जातात.
पुणे जिल्ह्यातील खरीप दृष्टीक्षेपात...
– जिल्ह्यातील तेरापैकी आठ खरीप तालुके
– खरीप तालुक्यांमध्ये हवेली, मावळ, मुळशी, भोर, वेल्हे, खेड, जुन्नर आणि आंबेगाव यांचा समावेश.
– जिल्ह्यातील खरीप गावे: १ हजार ३८०
– पुणे जिल्ह्याचे खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र (उसासह) तीन लाख ६२ हजार हेक्टर.
– एकूणपैकी खरीप पिकांसाठीचे क्षेत्र — एक लाख ९५ हजार हेक्टर.











