कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयानंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. यादरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याचे प्रयत्न जोरात सुरू झाले आहेत. यासाठी नितीशकुमार यांनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत आढावा बैठकही घेतली आहे. या सगळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षांमधील पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून स्वतःला बाहेर केले आहे. अशा राजकीय परिस्थितीत नितीशकुमार स्वत:ला कुठे पाहतात, असा प्रश्न विचारला जातो आहे. तसेच ते आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार का? हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.






आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी स्पष्ट केले. देशाच्या भल्यासाठी काम करणारे नेतृत्व विरोधकांना हवे आहे. विरोधकांना एकत्र करण्याचा माझा प्रयत्न आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही असेच प्रयत्न करत आहेत. मी पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत नाही कारण मी पुढील (लोकसभा) निवडणूक लढवणार नाही. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू राम ताकवले यांच्या निधनाबद्दल आयोजित शोकसभेनंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
शरद पवारांच्या नंतर काय…
2024 च्या लोकसभा निवडणुकांबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात गुंतलेले आहेत. यादरम्यान ते ही आगामी लोकसभा निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यादरम्यान नालंदा लोकसभा मतदारसंघातील जेडीयूचे लोकसभा खासदार कौशलेंद्र कुमार यांनी नितीश कुमार यांना निवडणूक लढवता यावी यासाठी आपली जागा सोडण्याची ऑफर दिली होती. याबाबत नितीश कुमार यांना विचारले असता ते म्हणाले की, सध्या या सगळ्यावर आमचे काही म्हणणे नाही.
नितीश कुमार यांच्यासाठी यूपीमधील काही जागांची नावेही चर्चेत होती, त्यानंतर नितीश कुमार हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर त्यांनी स्वत:बद्दल अनेकदा सांगितले आहे की ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाहीत. शरद पवारांपूर्वी नितीशकुमार यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून स्वत:ला बाहेर केले आहे. पण, शरद पवारांप्रमाणे नितीशकुमार यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत कधीच स्पष्टपणे काहीही सांगितले नाही. अशा स्थितीत शरद पवारांच्या नकारामध्ये नितीश कुमार यांच्या नावाला होकार लपलेला आहे असे बोलले जात आहे.
जागा वाटपाकडे लागलं लक्ष
या चर्चेदरम्यान सध्या जागा वाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही जागावाटपाच्या मुद्द्यावर विधान केले. महाविकास आघाडीचा (एमव्हीए) भाग असलेल्या काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या पक्षांसोबतच्या जागावाटपाबाबत ते म्हणाले, अलीकडेच माझ्या निवासस्थानी एक बैठक झाली.
यावर महाविकास आघाडीचे नेते निर्णय घेतील. उद्धव ठाकरे, सोनिया गांधी किंवा काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे आणि मी भेटून चर्चा करू. महाराष्ट्रातील अनेक नागरी संस्थांचा कार्यकाळ २०२२ च्या सुरुवातीला संपणार होता, परंतु कोरोनाच्या साथीच्या आजारामुळे निवडणुका झाल्या नाहीत. याशिवाय, लोकसभेच्या निवडणुका मे २०२४ च्या आसपास आणि त्यानंतर काही वेळाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.













