युद्धसदृश परिस्थितीमुळे इराणमध्ये अडकलेले २९० भारतीय विद्यार्थी घेऊन एक विशेष बचावविमान शुक्रवारी रात्री उशिरा दिल्लीत सुखरूप उतरले. हा **’ऑपरेशन सिंधू’**चा पहिला टप्पा मानला जात आहे. यानंतर अजून दोन चार्टर्ड फ्लाइट्स शनिवारी दिल्लीत पोहोचणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.






दोन उर्वरित फ्लाइट्स एक आश्गाबात, तुर्कमेनिस्तान येथून शनिवारी दुपारी ४:३० वाजता आणि रात्री ११:३० वाजता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल ३ वर उतरणार आहेत.
इराणकडून भारताला विशेष सहकार्य
इराणमध्ये सध्या हवाई क्षेत्र बंद असतानाही, भारताच्या बचाव मोहिमेला चालना देण्यासाठी इराणने आपल्या हवाई क्षेत्रात मर्यादित प्रवेश दिला. “इराणने भारताच्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सहकार्य केले आहे,” असे दिल्लीतल्या इराणी दूतावासाचे उपप्रमुख मोहम्मद जवाद हुसेनी यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी सांगितल्या अंगावर शहारे आणणाऱ्या आठवणी
“भारत माता की जय” आणि “हिंदुस्तान जिंदाबाद” अशा घोषणांनी दिल्ली विमानतळ दुमदुमून गेला, जेव्हा विशेष विमानाने भारतात पाऊल ठेवले.
“भारत सरकारने आमच्यासाठी खूप काही केले. आपल्या मातृभूमीत परतल्यावर जी शांतता मिळते, ती शब्दात मांडता येणार नाही,” असे एक विद्यार्थिनीने पीटीआयला सांगितले.
सेहरिश रफिक, इराण युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसमधील एमबीबीएस विद्यार्थिनी म्हणाली, “सुरुवातीला वाटले नव्हते की परिस्थिती इतकी बिघडेल. सर्व काश्मिरी विद्यार्थी भारत सरकारचे मनापासून आभारी आहोत.”
तजकिया फातिमा, नोएडाची रहिवासी म्हणाली, “आम्ही तिथे कसे बाहेर पडू याची कल्पना नव्हती. पण भारत सरकारने प्रक्रिया अगदी सुरळीत केली.”
मीर मोहम्मद मुशर्रफ, पुलवामा (काश्मीर) येथील रहिवासी म्हणाला, “ऑपरेशन सिंधू खूपच प्रभावी ठरले. आमचे घरमालकही आम्हाला सोडून गेले होते. पण दूतावासाने आम्हाला मार्गदर्शन केले आणि इथे आणले.”
२९० पैकी १९० विद्यार्थी जम्मू-काश्मीरमधील
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, आज परतलेल्या २९० पैकी तब्बल १९० विद्यार्थी जम्मू आणि काश्मीर मधील आहेत. “इराणने आपले हवाई क्षेत्र उघडल्यामुळे ही मोहिम शक्य झाली. हे दोन्ही देशांमधील दृढ संबंधांचे प्रतीक आहे,” असे अरुणकुमार चटर्जी, सचिव (कन्स्युलर, पासपोर्ट, व्हिसा), यांनी सांगितले.
१०,००० भारतीय अजूनही इराणमध्ये
इस्रायल-इराण संघर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात भारताने आपले नागरिक परत आणण्यासाठी हालचाली तीव्र केल्या आहेत. सध्या सुमारे १०,००० भारतीय मुख्यतः विद्यार्थी इराणमध्ये आहेत. अनेकांना तेहरानहून क़ोम आणि मशहदसारख्या सुरक्षित शहरांमध्ये हलवण्यात आले होते.
भारतीय अधिकाऱ्यांनी अद्याप अधिकृत बचाव सल्ला (evacuation advisory) जाहीर केलेला नसला तरी, नागरिकांनी सतर्क राहावे आणि अनावश्यक हालचाली टाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.













