राज्यातील 18 जिल्हे निशाण्यावर, हवामान खात्याकडून ‘येलो अ‍ॅलर्ट’ जाहीर; बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे वातावरणात बदल

0

उष्णतेच्या तीव्र लाटांची होरपळ सहन केलेला राज्यातील ग्रामीण भाग अवकाळी वादळी पावसाच्या निशाण्यावर आहे. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून आलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. सोमवारी पुणे, सांगली जिल्ह्यासह काही भागांना पावसाने झोडपले, तर पुढील ३ दिवसांत पावसाची व्याप्ती वाढेल, असा नवा अंदाज वर्तवत हवामान खात्याने राज्यातील १८ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ जारी केला.

राज्यात मार्चपासून उष्णतेची तीव्रता प्रचंड वाढली होती. महिनाभरात चौथ्यांदा उष्णतेच्या लाटांचे चटके नागरिकांनी सहन केले. त्यानंतर आता अवकाळी वादळी पावसाचे संकट ओढवले आहे. गेल्या दोन दिवसांत दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण कोकणातील काही ठिकाणी पावसाची नोंद झाली. सोमवारी पहाटे पुणे तसेच सांगली जिल्ह्यातील पलूस, तासगाव व शिराळा आदी भागांत पावसासह गारपिटीची नोंद झाली. पुढील तीन दिवसांत 18 जिल्ह्यांत पावसाळी हवामान राहील, पावसाच्या हजेरीमुळे मंगळवारपासून राज्यातील उष्णतेची तीव्रता कमी होईल, असे हवामान खात्याने जाहीर केले. ग्रामीण भागातील कमाल तापमानात दोन ते तीन अंशांची मोठी घसरण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

अधिक वाचा  पंतप्रधान मोदी यांना हादरा, महिला आरक्षण विधेयक नामंजूर २८ मते कमी; इतर 2 विधेयकेही मागे घेतली

वादळाची स्थिती

राज्यभरात सध्या पश्चिमी विक्षोभ म्हणजेच वादळाची स्थिती आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे प्रवाही झाले आहेत. या वाऱ्यांचा प्रभाव पुढील तीन ते चार दिवसांत वाढणार आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागांत पावसाळी हवामान आहे, असे हवामान तज्ञांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर रायगड, पुणे, कोल्हापूरसह 18 जिल्ह्यांना ‘येलो अ‍ॅलर्ट’ देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

‘या’ भागांना अ‍ॅलर्ट

नंदुरबार, धुळे, नाशिक, नाशिक घाट विभाग, अहिल्यानगर, रायगड, पुणे, पुणे घाट विभाग, सातारा, सातारा घाट विभाग, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशीव, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा व चंद्रपूर.

अधिक वाचा  मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! महिला खासदारांचा संसद आवारात संताप, उद्यापासून ही मोहीम