आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्स अखेर विजयाच्या ट्रॅकवर आली आहे. पहिला विजय मिळवल्यानंतर मुंबईचा लागोपाठ 4 सामन्यांमध्ये पराभव झाला, त्यानंतर आता मुंबईने गुजरातला 99 रननी धूळ चारली आहे. झुंजार आणि वादळी शतक करणाऱ्या तिलक वर्माला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, पण मुंबईच्या विजयात मोलाचं योगदान दिलं ते अश्विनी कुमार याने. या सामन्यात मुंबईला फक्त विजयच मिळाला नाही तर अश्विनी कुमार नावाचा हिराही मिळवून दिला आहे.






अश्विनी कुमारने फक्त 4 ओव्हरमध्ये 24 रन देऊन 4 विकेट घेतल्या. अश्विनीने त्याच्या या स्पेलमध्ये गुजरातचं कंबरडं मोडलं. अश्विनीने गुजरातचा कर्णधार शुभमन गिल, राहुल तेवातिया, शाहरुख खान आणि राशिद खान यांची विकेट घेतली. अश्विनी कुमारच्या या यशामागे त्याच्या आईचा अफाट संघर्ष आणि एका जिद्दी तरुणाची वेदनादायी कहाणीही दडलेली आहे.
आईमुळे पूर्ण झालं स्वप्न
29 ऑगस्ट 2001 रोजी मोहालीतील ‘झांझेरी’ या छोट्याशा गावात अश्विनीचा जन्म झाला. अश्विनी लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि संसाराची सर्व जबाबदारी त्याच्या आईवर आली. घराची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही आईने अश्विनीच्या क्रिकेटच्या स्वप्नांना कधी तडा जाऊ दिला नाही. गरिबीशी दोन हात करत आईने ओढूनताणून संसाराचा गाडा हाकला आणि अश्विनीला क्रिकेटच्या मैदानात उतरवले. आज अश्विनीच्या प्रत्येक यशात त्याच्या आईच्या कष्टाचा वाटा सर्वात मोठा आहे.
करिअर संपणार वाटले तेव्हा…
अश्विनीचा इथपर्यंतचा रस्ता काट्यांचा होता. स्थानिक क्रिकेटमध्ये नाव कमावत असताना त्याला एका भीषण दुखापतीने ग्रासले. ही दुखापत इतकी गंभीर होती की, तो पुन्हा कधी हातात बॉल घेऊ शकेल की नाही, अशी भीती निर्माण झाली होती. तब्बल एक वर्ष तो क्रिकेटपासून पूर्णपणे लांब होता. करिअर संपणार असे वाटत असतानाच अश्विनीने आईच्या संघर्षाची आठवण ठेवून पुन्हा जिद्दीने सराव सुरू केला आणि पूर्ण ताकदीनिशी पुनरागमन केले.
मुंबईने पारखला हिरा
आयपीएल 2024 च्या हंगामात अश्विनी पंजाब किंग्सच्या टीममध्ये होता, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र, मुंबई इंडियन्सने त्याच्यातील गुणवत्ता ओळखली आणि 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये 30 लाख रुपयांच्या बेस प्राईसवर त्याला आपल्या ताफ्यात घेतले. आजच्या सामन्यात जेव्हा त्याला संधी मिळाली, तेव्हा त्याने त्या संधीचे सोने करत मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अचूक टप्प्यावर बॉलिंग करण्याची आपली क्षमता अश्विनीने आज पुन्हा एकदा जगाला दाखवून दिली.












