महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठकही पार पडली. तर आता महायुती सरकारच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने मुख्यमंत्री फडणवीस यांना सोयाबीनवरून घेरलं आहे.सोयाबीनबाबत मुख्यमंत्री फडणवीस खोटं बोलत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.






नेमकं काय घडलं?
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी हा दावा केला आहे. नव्या सरकारची सुरुवातच अशा थापांनी होणार असेल तर पुढे शेतकऱ्यांनी आपल्या सरकारकडून काय अपेक्षा ठेवावी. जमिनीवर या, वास्तव पहा अन् मगच बोला.. शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा फसवू नका, जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका, असं ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना आवाहन केले आहे.
कैलास पाटील यांनी नेमकं काय म्हटलंय?
सन्माननीय देवेंद्रजी,
आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झालात याबद्दल प्रथमत: आपले मनःपूर्वक अभिनंदन! मागच्या सरकारमध्येही आपण मुख्य होतात. तेव्हा अनेक खोटी आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली गेली. आता आपल्या नेतृत्वाखालील सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा सर्वांना लागून आहे. मात्र, आपणही पुन्हा तोच कित्ता गिरवत आहात, असे दिसते.
आपण आजच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोयाबीन खरेदीचा मुद्दा सांगितला. आर्द्रतेचा निकष १२ टक्के होता. तो शेतकरी हित लक्षात घेऊन वाढवला व १५ टक्के आर्द्रता असणारे सोयाबीनही हमीभाव केंद्रावरून विकत घेत आहात व त्यामुळे विक्रमी खरेदी झाल्याचे आपण म्हटले आहे. पण, त्याची एकदा पडताळणी करायला हवी होती.केंद्रावरील वास्तव आपण म्हणता त्यापेक्षा वेगळे आहे.
Eknath Shinde: नाराज एकनाथ शिंदेंची भाजपकडून पुरती कोंडी; मनधरणी सोडून खातेवाटपात एकच पर्याय दिला!
धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील एकाही हमीभाव केंद्रावरून १५ टक्के आर्द्रता असणारे सोयाबीन खरेदी केले गेले नाही, आजही करीत नाहीत. आपण स्वतः काही केंद्रांना भेटी देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली आहे. त्यामुळे हे वास्तव आपणास अवगत करून देणे आवश्यक वाटते. नव्या सरकारची सुरुवातच अशा थापानी होणार असेल तर पुढे शेतकऱ्यांनी आपल्या सरकारकडून काय अपेक्षा ठेवावी, हा मोठाच प्रश्न आहे. त्यामुळे जमिनीवर या, वास्तव पहा अन् मगच बोला.. शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा फसवू नका, जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका, ही आपणास विनंती.. असं ट्विट करत कैलास पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. यामुळे आता राजकारणात खळबळ उडाली आहे.










