अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज; महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा

0

अरबी समुद्रावर तब्बल पंधरा दिवस रखडलेला नैऋत्य मोसमी वारा पुन्हा सक्रिय झाला असून, बहुतांश महाराष्ट्र व्यापल्यानंतर आता मॉन्सूनचा पुढील प्रवास वेगाने सुरू झाला आहे. राज्यातील तब्बल ३२ जिल्ह्यांमध्ये दोन-तीन दिवसांत पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. कोकणासह मुंबई महानगर प्रदेशात मध्यम ते जोरदार सरी कायम राहणार आहेत. रडार आणि उपग्रह निरीक्षणांनुसार मुंबई व उपनगरांमध्ये पुढील तीन-चार तासांतही मध्यम ते अधूनमधून जोरदार पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट, तर मुंबईसह अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

मंगळवारी (ता. २३) मॉन्सूनने पालघर ते वर्धापर्यंतच्या भागात पुढे सरकत राज्याचा बहुतांश भाग व्यापला. दोन आठवड्यांहून अधिक काळ अरबी समुद्रावर मॉन्सूनची प्रगती थांबली होती. मात्र सोमवारी (ता. २२) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात त्याने पुन्हा आगेकूच केली आणि आता त्याचा वेग वाढल्याचे चित्र आहे.

अधिक वाचा  नसरापूर तीन वर्षीय मुलीवर अत्याचार अंतिम युक्तिवादावेळी कठोर शिक्षेची विशेष सरकारी वकिलांची मागणी आत्ता २५ जूनला निकाल? 

मुंबई आणि उपनगरांमध्ये संपूर्ण रात्रभर मध्यम ते अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. सकाळच्या रडार निरीक्षणांनुसार मुंबईच्या पूर्वेकडील भागात मध्यम ते तीव्र स्वरूपाचे ढग सक्रिय असून, पुढील दोन ते तीन तासांत विशेषतः उपनगरांमध्ये मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे. उपग्रह आणि रडार चित्रांनुसार कोकणासह मुंबई परिसरात पुढील तीन ते चार तास पावसाची संततधार कायम राहू शकते.

रत्नागिरी जिल्ह्यासाठी जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा आणि पुणे जिल्ह्यासाठी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

अधिक वाचा  पूरस्थिती टाळण्यासाठी पुणे मनपाला निर्देश; आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

याशिवाय पालघर, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे घाटमाथा, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अकोला आणि अमरावती जिल्ह्यांसाठी उष्ण हवामानाचा येलो अलर्ट कायम आहे.

पुढील अंदाज काय?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवसांत मॉन्सून अरबी समुद्राचा आणखी काही भाग, गुजरात आणि मध्य प्रदेशातील काही भाग व्यापण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तीन ते चार दिवसांत झारखंड, बिहारच्या उर्वरित भागासह उत्तर प्रदेशातील काही भागातही मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मात्र कोकण, मुंबई महानगर प्रदेश, घाटमाथा आणि मराठवाड्याच्या काही भागांत पावसाची सक्रियता वाढत जाण्याचे संकेत आहेत. त्यामुळे जूनच्या अखेरीस राज्यातील अनेक भागांत समाधानकारक पावसाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अधिक वाचा  उद्धव ठाकरे यांचे वर्धापन दिन मेळाव्यात भावनिक उद्गार; ‘डगमगलेलो नाही, खचणार नाही; क्षणात पक्षप्रमुखपद सोडेन