खडकवासला धरण क्षेत्रात ७५ मिमी पाऊस; पिण्याच्या पाणीसाठ्याबाबत चिंता कायम साठा केवळ १३ टक्के

0

खडकवासला धरण साखळीत १ जूनपासून बुधवारी (दि. २४) सकाळी सहा वाजेपर्यंत झालेल्या पावसाच्या नोंदीत खडकवासला धरण क्षेत्र आघाडीवर आहे. खडकवासला येथे सर्वाधिक ७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, टेमघर येथे ६१ मिलीमीटर, पानशेत येथे ५७ मिलीमीटर आणि वरसगाव येथे ५५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरण क्षेत्रात मंगळवारी पहाटेपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. खडकवासला परिसरात मंगळवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पावसाची नोंद झाली नव्हती. मात्र त्यानंतर बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत २४ मिलीमीटर पाऊस झाला. मागील काही दिवसांच्या तुलनेत धरण क्षेत्रातील पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. तरीही चारही धरणांमधील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नसल्याने पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील साठ्याबाबत चिंता कायम आहे.

अधिक वाचा  पाणीटंचाईचे मोठे संकट; पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून चिंता; कर्जमाफी योजनेत सुधारणा

पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सहा ते बुधवारी सकाळी सहा या २४ तासांत वरसगाव धरण क्षेत्रात सर्वाधिक ५५ मिलीमीटर पाऊस झाला. पानशेत येथे ५४ मिलीमीटर, टेमघर येथे ३४ मिलीमीटर, तर खडकवासला येथे २४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे धरण क्षेत्रात काहीसा दिलासा मिळाला असला, तरी धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक(इन्फ्लो) अद्याप सुरू झालेली नाही.

साधारणपणे जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडून धरणांमध्ये आवक सुरू होते. मात्र यंदा पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्याने पाणीसाठा वाढण्याचा वेग मंदावला आहे.

अधिक वाचा  भाजपाची 2029ची तयारी? नाशिकमध्ये साधलं अन् सातारा-सांगलीत थोडक्यात… मविआचा वाईट पराभव! 17 जागांचा निकाल सविस्तर माहिती

सध्या खडकवासला धरणात ०.४४ टीएमसी (२२.४६ टक्के), पानशेत धरणात १.८८ टीएमसी (१७.६३ टक्के) आणि वरसगाव धरणात १.५० टीएमसी (११.६७ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. टेमघर धरणात अद्याप उपयुक्त साठा जमा झालेला नाही. चारही धरणांमध्ये मिळून सध्या ३.८२ टीएमसी पाणी उपलब्ध असून, तो एकूण क्षमतेच्या केवळ १३.१० टक्के आहे.

गेल्या वर्षी याच दिवशी खडकवासला धरण साखळीत ११.२७ टीएमसी, म्हणजेच ३८.६७ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्या तुलनेत यंदाचा साठा तब्बल ७.४५ टीएमसीने कमी आहे. यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात धरण क्षेत्रात पावसाची मोठी तूट असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षी जूनच्या सुरुवातीपासूनच धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाल्याने पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली होती. यंदा मात्र जूनचा अखेरचा आठवडा सुरू होऊनही समाधानकारक पाऊस झालेला नाही.

अधिक वाचा  नसरापूरच्या चिमुरडीला 52 दिवसांतच न्याय; सर्वाधिक जलदगती चाललेल्या खटल्यांपैकी एक ठरण्याची शक्यता

हवामान विभागाने पुढील काही दिवस घाटमाथा आणि धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू होऊन साठ्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे. मात्र जून महिन्याच्या अखेरीसही पाणीसाठा केवळ १३ टक्क्यांवर असल्याने पाटबंधारे विभागासह नागरिकांचे लक्ष आता आगामी पावसाकडे लागले आहे.