लोहगड युवक मृत्यू प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; होणाऱ्या बायकोनेच केला ‘गेम’? अपघात नव्हे हत्याच!

0

लोणावळा परिसरातील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरून पडून झालेल्या तरुण व्यावसायिकाच्या मृत्यू प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले आहे. सुरुवातीला अपघात मानल्या गेलेल्या या घटनेमागे नियोजनबद्ध कट असल्याचा संशय पोलिस तपासातून समोर आला आहे. या प्रकरणात मृत तरुणाच्या होणाऱ्या पत्नीचा आणि तिच्या एका मित्राचा सहभाग असल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागल्याने खळबळ उडाली आहे. मृत केतन अग्रवाल हा नामांकित उद्योजक कुटुंबातील असून त्याचा विवाह पुण्यातील एका प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील तरुणीसोबत निश्चित झाला होता. काही दिवसांतच हा विवाह सोहळा राजस्थानमधील जयपूर येथे मोठ्या थाटामाटात पार पडणार होता. विवाहाच्या तयारीसाठी दोन्ही कुटुंबांकडून मोठ्या प्रमाणात नियोजन सुरू होते. मात्र, लग्नापूर्वीच घडलेल्या या घटनेने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

तपासादरम्यान समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुणीला हे लग्न मान्य नसल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली आहे. त्यातूनच तिने आपल्या निकटवर्तीय मित्राच्या मदतीने केतनला मार्गातून दूर करण्याचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेच्या दिवशी केतनला फिरण्याच्या निमित्ताने लोहगड किल्ल्यावर नेण्यात आले. किल्ल्याच्या दुर्गम भागात गेल्यानंतर त्याला खोल दरीत ढकलण्यात आल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचे चित्र निर्माण झाले होते.

अधिक वाचा  पतित पावन संघटनेतर्फे ‘स्मार्ट मीटर’ लावण्यास विरोध; महावितरण पुणे ऑफिस बाहेर स्मार्ट मिटरच्या पोस्टरची होळी

मात्र, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक पुरावे, मोबाईल कॉल डिटेल्स, लोकेशन ट्रॅकिंग आणि संबंधित व्यक्तींच्या हालचालींचा बारकाईने अभ्यास केला. तपासाची दिशा बदलल्यानंतर संशयितांकडे चौकशीचा फेरा वळविण्यात आला. चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर आल्याने प्रकरणातील कथित कट उघडकीस आल्याचे सूत्रांनी सांगितले.

या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असून संबंधित संशयितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. उच्चभ्रू व्यावसायिक कुटुंबांशी संबंधित असलेल्या या प्रकरणामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत पोलिसांकडून प्रकरणातील सर्व बाबींची सखोल पडताळणी केली जात असून, पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.

तपास यंत्रणांच्या हाती आलेल्या माहितीनुसार, केतनच्या होणाऱ्या पत्नीचा आणि तिच्या कथित प्रियकराचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे या प्रकरणाने पुणे, लोणावळा आणि व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी याबाबत माहिती दिली. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात गेल्या काही वर्षांपासून जवळचे संबंध होते. दरम्यान, सियाचा विवाह उद्योजक केतन अग्रवाल याच्यासोबत ठरला होता. दोन्ही कुटुंबांत लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. राजस्थानमधील जयपूर येथे हा शाही विवाहसोहळा पार पडणार होता. मात्र, या लग्नाबाबत सिया समाधानी नसल्याची बाब तपासादरम्यान समोर आली आहे. लग्नाआधी प्री-वेडिंग फोटोशूटसाठी केतन आणि सियाला इंडोनेशियातील बाली येथे पाठवण्याचा निर्णय अग्रवाल कुटुंबीयांनी घेतला होता. त्यासाठी प्रवासाचे संपूर्ण नियोजन करण्यात आले होते. दोघे पुण्यातून मुंबई विमानतळावरही पोहोचले. मात्र, अचानक केतनचा पासपोर्ट हरवल्याचे समोर आले आणि हा दौरा रद्द करावा लागला. त्यानंतर दोघेही पुण्यात परतले. तपास यंत्रणा आता या घटनेकडेही संशयाच्या नजरेने पाहत आहेत.

अधिक वाचा  निधी नसल्याच्या तक्रारीने फुटलेल्या ठाकरेगटाच्या ६ खासदारांची धक्कादायक माहिती मुळात सक्रियता नाही

केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी माध्यमांशी आपली व्यथा मांडली. “सियाच्या नातेवाईकांकडून हे स्थळ आले होते. फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाला. सुरुवातीला सर्व काही ठीक होतं. पण काही दिवसांनी तिचा स्वभाव बदलू लागला. केतन मला अनेकदा म्हणायचा, ‘पप्पा, तुम्ही तिच्याबद्दल नीट चौकशी केली होती का? ती सतत भांडते, चिडचिड करते.’ पण ती आपल्या नात्यातीलच मुलगी असल्याने आम्ही त्याकडे फारसं गांभीर्याने पाहिलं नाही,” असे त्यांनी सांगितले.

विशाल अग्रवाल यांच्या मते, बाली ट्रिप रद्द झाल्यानंतर सियाचा लोहगड किल्ल्यावर जाण्याचा आग्रह वाढला होता. “ते एकदा जाऊन आले होते. त्यानंतर पुन्हा जायचा आग्रह सुरू होता. माझ्या पत्नीने केतनला विरोधही केला होता. पण तिसऱ्यांदा ते पुन्हा गेले. १८ तारखेला सकाळी ते किल्ल्यावर गेले आणि काही वेळातच फोन आला – तुमचा मुलगा किल्ल्यावरून पडला,” असे सांगताना विशाल अग्रवाल यांचा कंठ दाटून आला.

अधिक वाचा  उद्धव ठाकरे यांचे वर्धापन दिन मेळाव्यात भावनिक उद्गार; ‘डगमगलेलो नाही, खचणार नाही; क्षणात पक्षप्रमुखपद सोडेन

“माझा मुलगा इतका हुशार होता की तो सहज दरीत पडेल, यावर आमचा विश्वासच बसत नाही. त्या ठिकाणी रेलिंग आणि कठडे आहेत. तो अपघात असूच शकत नाही,” असे म्हणत त्यांनी थेट खुनाचा आरोप केला.

“त्या मुलीचे दुसऱ्या तरुणासोबत संबंध होते. ती त्याच्यासोबत उदयपूर येथे फिरायलाही गेली होती. तिचे अनेक आक्षेपार्ह चॅट्सही समोर आले आहेत. माझ्या मुलाचा खून झाला आहे. मला फक्त न्याय हवा आहे,” असे म्हणताना विशाल अग्रवाल यांना अश्रू अनावर झाले.

पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल्स, लोकेशन ट्रॅकिंग, सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधितांच्या हालचालींचा तपशील तपासण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, तपास अधिक वेगाने पुढे जात आहे.

काही दिवसांतच जयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात होणाऱ्या विवाहाची स्वप्ने पाहणाऱ्या अग्रवाल कुटुंबावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका तरुण उद्योजकाचा मृत्यू, त्यामागील संशयित प्रेमसंबंध आणि कुटुंबीयांचे आरोप यामुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहे.