राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राज्यातील महत्त्वाचा पक्ष असून विभिन्न स्तरावर 1999 पासून केलेल्या कामामुळे जनमानसात चांगली प्रतिमा असलेल्या राष्ट्रवादी पक्षाची सुत्रे मी स्वीकारल्यापासून पक्षात केंद्रीय व राज्यस्तरावर बरेच काही घडले मी ते समजून घेतले पण यापुढे पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. पक्षहिताला माझे सर्वोच्च प्राधान्य राहील. मला कठोर निर्णय घ्यायला भाग पाडू नका, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षातील बुजुर्ग नेत्यांना सज्जड दम दिला.






राष्ट्रवादीचा २७ वा वर्धापन दिन पार पडला. अजित पवार यांच्या निधनानंतरचा पक्षाचा पहिलाच वर्धापन दिन होता. त्यामुळे सुनेत्रा यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष होते. त्या भाषणाला उभा राहताच, वहिनीसाहेब… वहिनीसाहेब…. या घोषणांना सभागृह दणाणून गेले. अजित पवार अमर रहे, अशा घोषणा दिल्या जात होत्या. अजित पवार यांच्या आठवणी सांगताना सुनेत्रा पवार यांचा भाषणामध्ये अनेकदा कंठ दाटून आला. अनेकदा काही सेकंद त्या बोलू शकल्या नाहीत. माझ्यावर आलेल्या जबाबदारीची व कर्तव्याची जाणीव आहे. कार्यकर्त्यांची निष्ठा लक्षात घेवून त्याला संधी मिळेल. अजित पवार यांनी अनेकांचे हट्ट पुरवले अनेकांना मोठी पदे दिली समजूनही घेतले. पण, मी पक्षहिताला सर्वोच्च प्राधान्य देईन. ज्येष्ठांचा आणि महिलांचा पक्षात सन्मान राखला जाईल. पण, पक्षात कुणाचाही हस्तक्षेप चालणार नाही, असे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
यावेळी व्यासपीठावरील नेत्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले हाेते. सुनेत्रा पवार यांचे संपूर्ण भाषण लिखीत होते. पण, पक्षातील हस्तक्षेपाच्या मुद्याबाबत बोलताना त्यांनी लिखीत भाषणा बाजूला ठेवले. हा मुद्दा मांडच असताना सभागृहात शांतता होती. गेले काही दिवस पार्थ पवार विरुद्ध प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ अशा नेतेमंडळींमध्ये वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नये हा दिलेला इशारा बोलका ठरतो.
किती काळ पक्षात काम केले याला महत्व नाही. तुम्ही पक्षाला किती पुढे नेले यावर तुमचे पक्षातील स्थान ठरेल. लवकरच महामंडळाचे वाटप होणार आहे. त्यावेळी चर्चा करुन नियुक्त्या होतील. त्यामध्ये निष्ठावंतांना संधी दिली जाईल. अल्पसंख्याक, दलित, आदिवासी यांच्या सुरक्षिततेला पक्षाचे प्राधान्य राहील. जात व धर्माच्या व्देषाला पक्षात थारा नाही. महाराष्ट्रधर्माची लढाई पक्ष निष्ठेने लढेल. राजकीय तडजोड करणार नाही. शहरी भागाकडेही आता लक्ष द्या. पक्ष संघटना मजबूत करा. पक्षाकडून वेळोवेळी कार्यक्रम दिले जातील, अशा सूचना सुनेत्रा पवार यांनी दिल्या.












