निकालाच्या एक दिवस आधीच निवडणूक आयोगाची अचानक पत्रकार परिषद, जाणून घ्या नेमकं कारण काय ?

0

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेली लोकसभा निवडणूक 2024च्या सातही टप्प्यातील मतदान पार पडले असून ही निवडणूक आता संपली आहे. एक्झिट पोलचे आकडेही समोर आले आहेत. आता सर्वजण 4 जूनची वाट बघत असून तेव्हा मतमोजणी होऊन निवडणूक आयोग सार्वत्रिक निवडणुकांचे अंतिम निकाल जाहीर करेल. जनतेने कौल कोणाला दिला, भाजपचं सरकार पुन्हा येणार की इंडिया आघाडी भाजपची घोडदौड रोखू शकेल, हे आता काही तासांतच स्पष्ट होणार आहे. दरम्यान उद्या ( 4 जून मंगळवार) होणाऱ्या मतमोजणीपूर्वी आज निवडणूक आयोगाने महत्वाची प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी 12:30 वाजता निवडणूक आयोगातर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मतदानाची टक्केवारी आणि मतमोजणीबाबत आयोगातर्फे महत्त्वाची घोषणा करू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

अधिक वाचा  नितीश कुमारांचा राजीनामा अन् बिहारमध्ये उलथापालथ; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा

मतदान संपल्यानंतर निवडणूक आयोगाकडून अशी पत्रकार परिषद घेण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे. लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे असे निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांना पाठवलेल्या निमंत्रणात नमूद करण्यात आले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत प्रत्येक टप्प्याच्या मतदानानंतर उपनिवडणूक आयुक्त पत्रकारांना माहिती देत ​​असत, मात्र आता ही प्रथा रद्द करण्यात आली आहे. अशा स्थितीत आज सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा निवडणूक आयोगाकडे लागल्या आहेत. भारतीय जनता पक्ष आणि भारत आघाडीच्या शिष्टमंडळाने रविवारी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्यासमोर काही मागण्या मांडल्या, त्यानंतर ही पत्रकार परिषद बोलावण्यात आली अशी माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा  कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त संविधान प्रबोधनचे आयोजन!

जयराम रमेश यांच्या दाव्यावर निवडणूक आयोगाची भूमिका काय ?

4 जून रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 150 जिल्हा अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून चर्चा केली होती,असा दावा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला होता. त्यांच्या याच दाव्याद्दल निवडणूक आयोगाने रविवारी त्यांच्याकडून तपशील मागितला. यासंदर्भात त्यांना एक पत्र पाठवून रविवारी संध्याकाळच्या आता दाव्यांबद्दल तपशील देण्यास सांगितले होते. 1 जून रोजी जयराम रमेश यांनी सोशल मीडिया साईट X वरील पोस्ट केली होती. त्यामध्ये त्यांनी दावा केला होता की गृहमंत्री जिल्हा अधिकारी/कलेक्टर यांना फोन करत आहेत. आतापर्यंत ते 150 जणांशी बोलले असे त्यात नमूद करण्यात आले होते.

अधिक वाचा  दापोलीत बौद्धजन पंचायत समितीच्या शाखा क्र. २१ चे मोठ्या उत्साहात उद्घाटन

एक्झिट पोलमध्ये भाजपला कौल

1 जून रोजी देशातील सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान संपल्यानंतर विविध सर्वेक्षण संस्थांनी एक्झिट पोल जाहीर केले. यामध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपचे सरकार स्थापन करेल असे अंदाज वर्तवण्यात आला. एवढेच नव्हे तर इंडिया आघाडीचे बरेच नुकसाना झाल्याचा दावाही करण्यात आला. वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये एनडीएने 350 हून अधिक जागा मिळवण्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, इंडिया आघाडीने हे एक्झिट पोल स्वीकारण्यास नकार दिला आहे. या निवडणुकीत इंडिया अलायन्स 295 जागा जिंकेल, असा दावा विरोधकांनी केला आहे.