पुण्यात कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात एरवी, समाज माध्यमांवर स्टोरी, स्टेटस आणि पोस्टच्या माध्यमांतून व्यक्त होणारी तरुणाई पेपरफुटीवरून सरकारला थेट रस्त्यावर उतरून जाब विचारत असल्याचे चित्र गुरुवारी विद्यापीठात दिसले. शिक्षण व्यवस्थेत बदलांच्या अपेक्षेने वेगवेगळ्या भागांतील विद्यार्थांनी या आंदोलनात भाग घेतला. आंदोलनाचा चेहरा म्हणून जेन-झी समाज माध्यमांवर पुढे येत होते, मात्र चळवळीतल्या जुन्या ‘नौजवान भारत सभा’, ‘राष्ट्र सेवा दल’, ‘महाराष्ट्र विद्यार्थी संघटना’ आणि ‘एसएफआय’ यांसारख्या डाव्या आणि पुरोगामी संघटना आंदोलनात सहभागी झाल्या. तर, शिक्षण-पर्यावरणाचा विचार मांडण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक थेट लडाखवरून दाखल झाले. ॲड. असीम सरोदे, डॉ. विश्वंभर चौधरी, नामदेव जाधव आदीही या वेळी उपस्थित होते.






‘शिक्षणात आज मोठ्या प्रमाणावर अंधार दिसतो. आता तर परीक्षांमध्येही घोटाळे होत आहेत. त्यासाठी व्यवस्थेला जबाबदार धरलेच पाहिजे. सरकारने याची जबाबदारी घेतली पाहिजे. शिक्षण आणि पर्यावरण हेच आपले मुद्दे आहेत. स्वच्छ पाणी, हवा हा आपला अधिकार आहे. त्यासाठी सत्याच्या मार्गाने लढा द्यायचा आहे. अहिंसक मार्गाने आंदोलन पुढे गेले, तर मोठा बदल होण्याची शक्यता आहे,’ असे वांगचुक यांनी यावेळी सांगितले.
सुरुवातीला वरवर मागण्या असणाऱ्या अभिजीत दिपके यांनी पुण्यातील आंदोलनामध्ये आपल्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करत आगामी वाटचालीबाबत माहिती दिली. ‘पेपर फुटले, विद्यार्थी मेले. पण, कोणी राजीनामा द्यायला तयार नाही. देशाच्या विश्वगुरूंना एक प्रश्न आहे, ‘तुमच्यासाठी एक कोटी विद्यार्थी महत्त्वाचे, की एक मंत्री?’ असे विचारणा करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य करण्याचे काम केले. पंतप्रधानांच्या आशीर्वादाने देशांमध्ये गेल्या दहा-बारा वर्षांपासून देशात फक्त हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण सुरू आहे. देशातील बेरोजगार तरुणांनी आता या ध्रुवीकरणाचा विचार करणे बंद करून देशातील अत्यंत महत्त्वाच्या आणि दिवसेंदिवस जटील होत चाललेल्या नोकरी, महागाईचा विचार केला पाहिजे असे आवाहन अभिजीत दिपके यांनी यावेळी केले.
‘मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉक्रोच जनता पक्षावर केलेल्या टिकेला अभिजीत दिपके यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना फॉलो करणारे, ‘जय भीम’च्या घोषणा देणारे, अराजकवादी आहेत का? तुम्ही म्हणता राज्यघटना फक्त आमच्या हातात आहे. पण, तुम्हीच सांगा, राज्यघटनेत पहाटे पाच वाजता शपथ घ्यावी, असे कुठे लिहिले होते? विरोध करणाऱ्यांना पाकिस्तानी म्हणता, मग फक्त ‘भाजप’वालेच भारतीय आहेत का? या देशातील युवक तुमच्या राजकारणाला कंटाळला आहे. जिथे सडलेली जागा असते, तिथेच कॉक्रोच येतात. आता सिस्टीम सडली आहे, म्हणून कॉक्रोच रस्त्यावर आले आहेत.
मीम्स, फलक, घोषणा आणि निर्धारही
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे मीम्स, फलक, घोषणा आणि वेगवेगळ्या परीक्षांमध्ये नशीब आजमावू पाहणारे विद्यार्थी. त्यांना पाठिंबा द्यायला आलेले पालक-शिक्षक. कॉक्रोच जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनाचा प्रारंभ गुरुवारी अशा वातावरणात झाला.











