महाराष्ट्रात हवामानाचा पुन्हा उलटफेर! 10 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा, या भागात मोठं संकट

0

महाराष्ट्रात सध्या हवामानाची दोन टोकं पाहायला मिळत आहेत. एका बाजूला पावसाच्या सरींमुळे काही भागांना दिलासा मिळत असताना, दुसऱ्या बाजूला विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्हे प्रचंड उष्णतेने होरपळत आहेत.हवामान विभागाने काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून काही भागांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात पाऊस आणि उकाडा यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे.

पश्चिमेकडून मान्सूनचे वारे पुढे सरकले आहेत. महाराष्ट्रात सोलापूर आणि घाटमाथ्यावर मान्सूनचे वारे पोहोचल्याने विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला आहे. तर मुंबई सह उपनगरात पावसाच्या सरी बरसत आहेत. सध्या पाऊस सलग नसला तरीसुद्धा अजूनमधून येणाऱ्या सरीनंतरही गारवा जाणवत नाही उलट जास्त उकाडा जाणवत आहे. दमट वातावरणामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. अजूनही संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून आलेला नाही. तळ कोकणातच मान्सूनने तळ ठोकला आहे. मात्र मध्य महाराष्ट्रात मान्सून संथ गतीनं सुरू आहे.

कोणत्या जिल्ह्यांना सोसावा लागणार पावसाचा मारा?

अधिक वाचा  राष्ट्रवादीचं पुन्हा धक्कातंत्र, भुजबळ, राणांचाही पत्ताकट; सलग 12 वर्षे प्रतिनिधित्व केलेल्या या नेत्याला राज्यसभेची लॉटरी लागली

पर्जन्यमानाच्या अंदाजानुसार हवामान विभागानं मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत जोरदार पावसाची हजेरी असेल. यादरम्यान ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहतील. तर, समुद्रसुद्धा खवळलेला असेल याची नागरिकांनी काळजी घ्यावी.

पावसाचं हे सत्र एका दिवसापुरताच मर्यादित राहणार नसून, 10 ते 13 जूनदरम्यान मुंबई, नवी मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात हे चित्र कायम असेल. तर, घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढेल असा अंदाज आहे. नाशिक, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांना विजांच्या कडकटाडासह पाऊस पाहायला मिळेल.

रत्नागिरीत प्रशासनाला भलतीच भीती

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांनी चिपळूण, गुहागर,खेडसह जिल्ह्यातील तब्बल 181 गावे दरडप्रवण क्षेत्र म्हणून घोषित करत नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. चिपळूणमध्ये 17 गावं आणि गुहागर 20 गावं दरड प्रवण क्षेत्रात येत असून, त्या धर्तीवर प्रशासन अलर्ट मोडवर असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रशासनाने आपली बचाव यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

अधिक वाचा  कुठलीही चर्चा नसताना राज्यसभेची उमेदवारी मिळाली; राजेंद्र जैन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान-पाकिस्तानकडून सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे येणाऱ्या वाऱ्यांनी उत्तरेकडील हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे गोव्यापासून काही अंतर आता समुद्र किनाऱ्यावर सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. ते कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतरीत होणार का ते येत्या 48 तासांत पाहायला मिळेल.

महाराष्ट्रात तळ कोकण वगळता ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. विदर्भात उकाडा भयंकर वाढत असून उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत अजूनही तापमान 43 ते 45 डिग्रीपर्यंत आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मागच्या 24 तासांत बारामती, जेऊर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्यातील लोकांना मान्सूनची वाट पाहावी लागणार आहे. सध्या तिथे तापमान जास्त राहील असा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 12 तारखेपासून मुंबई आणि उपनगरात मान्सूनचा पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यानंतर हळूहळू पुढे सरकेल. अजून पुणे आणि उत्तर महाराष्ट्रातही मान्सून पोहोचलेला नाही.

अधिक वाचा  बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने गाव व मुंबई कौन्सिल सभा मोठ्या उत्साहात संपन्न

सांगली, सोलापूर, कोल्हापूर, तळ कोकण, लातूर, धाराशिवचा काही पट्टा, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपुरात वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पाऊस धुमाकूळ घालणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना छत्री, रेनकोट घेऊनच बाहेर पडा, आडोशाला उभं राहताना वीज कोसळणार नाही ना याची दक्षता घेऊनच उभं राहावं. या दरम्यान 50 ते 60 किमी सोसाट्याचा वारा राहण्याची शक्यता आहे.

राजस्थान आणि गुजरात कडून येणाऱ्या कोरड्या हवेच्या प्रवेशामुळे महाराष्ट्राच्या काही भागांतील मान्सूनच्या प्रवाहात व्यत्यय येईल. मुंबई आणि पुणे ही शहरे या हवामान प्रणालीच्या सीमावर्ती भागात असल्याने, पुढील ४-५ दिवसांत मुंबईत पावसाची शक्यता कमी असेल असा इशारा काल हवामान विभागाने दिला होता.