सरन्यायाधीश सूर्यकांत शर्मा यांनी एका प्रकरणात सुनावणी करताना देशातील बेरोजगार तरुणाईला झुरळासोबत तुलना करत संतापाला वाट मोकळी करून दिली.यानंतर झालेल्या सोशल मीडियातील उद्रेकात मराठी तरुणानं थेट काॅकरोच जनता पार्टी स्थापन करत त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिली. बघता बघता याच पार्टीनं इन्स्टावर जगातील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपला मागे टाकलं आहे. या पक्षाने केलेला जाहीरनामा सुद्धा चर्चेत असून तरुणाईने अभिजितच्या उपहासात्मक मोहिमेला जबरदस्त पाठबळ दिलं आहे. त्यामुळे अभिजितच्या काॅकरोच जनता पार्टीची चर्चा रंगली आहे.






एबीपी माझाने अभिजित दीपकेशी संवाद साधला. यावेळी त्याने निर्भिडपणे तरुणांच्या मनातील दाहकता मांडताना निवडणूक आयोगाच्या कारभाराची सुद्धा चिरफाड केली. यावेळी त्याने लोकसभेला महाराष्ट्रात धुळदाण झालेल्या भाजपला विधानसभेला अशी कोणती छडी मिळाली ज्यामुळे इतकं यश मिळालं? अशी विचारणा केली.
लोकसभेत भाजपला फक्त नऊ जागांवर आणून ठेवलं होतं
अभिजित दीपके म्हणाला, आमचा दुसरा मुद्दा इलेक्शन कमिशनवर आहे. मागील काही इलेक्शनमध्ये बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात 50 हजार मतं डिलीट झाली, त्या काही 15 हजार मतांनी हारल्या. एम. के. स्टॅलिन 15 हजार मतांनी हारले. दिल्लीमध्ये केजरीवाल यांच्या सीटवर 40 हजार मतं डिलीट झाली, ते चार-पाच हजार मतांनी हारले. आपल्या महाराष्ट्रात काय झालं? लोकसभेत भाजपला फक्त नऊ जागांवर आणून ठेवलं होतं. चार-पाच महिन्यांनंतर तीच भाजप 132 जागा घेऊन बसली. जिथे जिथे मतं डिलीट होत आहेत, तिथे तिथे फक्त भाजपला फायदा होतोय आणि विरोधकांना नुकसान होतंय, हा पॅटर्न काय सांगतोय? असा सवाल अभिजितने केला.
जजेसच्या अपेक्षा सेट होत आहेत
अभिजितने सांगितले की, भारताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया (CJI) आहेत त्यांना असं का वाटलं की जे लोक सिस्टम विरुद्ध बोलतात ते कॉकरोच आणि पॅरासाईट आहेत? चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचा रोल संविधानाची रक्षा करणे आणि लोकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करणे हा आहे. त्यातलाच एक अधिकार हा ‘फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन’ म्हणजेच बोलण्याचा अधिकार आहे. ज्यांचे काम या अधिकाराची रक्षा करणे आहे, तेच जर बोलणाऱ्यांना कॉक्रोच आणि पॅरासाईट म्हणत असतील, तर हे खूपच ‘सॅड स्टेटमेंट’ होतं. म्हणूनच आम्ही ही कॉकरोच जनता पार्टी सुरू केली. सुप्रीम कोर्टाचे जे जजेस असतात, त्यांना रिटायरमेंटनंतर सरकारकडून एखाद्या कमिटीचे चेअरमन बनवले जाते किंवा राज्यसभेत पाठवले जाते. याच्यामुळे जजेसच्या अपेक्षा सेट होत आहेत की मला रिटायरमेंटनंतर काहीतरी भेटेल, त्यामुळे मी सरकारसोबत गुड टर्म्सवर असलं पाहिजे.
या मोहिमेचे राजकीय पक्षात रूपांतर होणार का?
अभिजितने सांगितले की, नक्कीच होईल, पण आता काही सांगणं थोडं अवघड असेल. कारण ही पार्टी आम्ही काही प्लॅनिंग करून सुरू केलेली नव्हती. जर चीफ जस्टिस ऑफ इंडियांचे ते स्टेटमेंट आले नसते, तर आज मी इथे इंटरव्ह्यूला बसलो नसतो. तीन-चार दिवसांतच आमच्याकडे 1 कोटी 10 लाख लोक इन्स्टाग्रामवर जोडले गेले आहेत. इतक्या लोकांशी बोलून प्लॅनिंग करणे सध्या अवघड आहे. आम्ही आधी या लोकांशी बोलू, त्यांच्याकडून इनपुट्स घेऊ की त्यांचा सध्याच्या सिस्टिमवर आणि सरकारवर एवढा राग का आहे?













