स्थानिक पंचायत निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव होऊन काँग्रेसचा उमेदवार विजयी झाल्याने, एका संतप्त भाजप कार्यकर्त्याने अख्ख्या गावाचे पाणी बंद केले. ७०० लोकसंख्या असलेल्या या गावातील लोकांना तब्बल दोन दिवस पाण्याचा एक-एक थेंब मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील एका गावातून विचित्र घटना समोर आली आहे. अखेर हे प्रकरण अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर दोन दिवसांनी गावाचा पाणीपुरवठा सुरु करण्यात आला.






बोरवेलवर हक्क सांगत ७०० लोकांचे पाणी रोखले
हा सगळा धक्कादायक प्रकार दादरा आणि नगर हवेलीच्या सीमेजवळ असलेल्या वलसाड जिल्ह्यातील गढवी गावात घडलं. हा आदिवासी बहुल भाग असून येथील ‘तबाडमाल फलिया’ भागात सुमारे ७०० लोक राहतात. या संपूर्ण वस्तीसाठी राज्य सरकारने सरकारी जमिनीवर एकच बोरवेल मंजूर करून लावला होता.
२६ एप्रिल रोजी झालेल्या कपराडा तालुका पंचायत निवडणुकीत एकूण २२ जागांपैकी १८ जागांवर भाजप तर ४ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला. गढवी गावात काँग्रेसच्या मनीषा गोंड यांनी भाजपच्या याशी खारप्रदे ज्या गावच्या सरपंचांच्या सून आहेत यांचा पराभव केला. या पराभवाचा राग मनात धरून भाजपचा स्थानिक कार्यकर्ता अमरेश तुलजी बुधल याने १७ मे रोजी गावकऱ्यांना शासकीय बोरवेलवरून पाणी भरण्यास सक्त मनाई केली.
“तुम्ही भाजपला मत दिले नाही, म्हणून पाणी बंद”
गावातील नागरिक भारत सुरुम यांनी दिलेल्या माहितीनुसार, “अमरेशने आमच्या वस्तीतील ३५ कुटुंबांना धमकावले की, तुम्ही लोकांनी स्थानिक निवडणुकीत भाजपला मते दिली नाहीत. हा बोरवेल माझ्या सांगण्यावरून मंजूर झाला होता, त्यामुळे यावर माझाच हक्क आहे. आता माझ्या नातेवाईकांशिवाय गावातील इतर कोणालाही यातून पाणी घेता येणार नाही.”
भीषण उष्णता असताना पाणी बंद झाल्याने गावातील महिलांवर संकट कोसळले. पिण्याच्या पाण्यासाठी गावातील महिलांना १ किलोमीटर दूर डोंगराळ आणि जंगलाच्या रस्त्यावरून पायपीट करत हंडे भरून पाणी आणावे लागत होते.
भाजप आमदाराने फटकारले सरपंचांचा विरोध
महत्त्वाचे म्हणजे गढवी गावचे सरपंच बापू खारप्रदे हे स्वतः भाजपचे आहेत. त्यांनी सांगितले की, “१९ मे रोजी जेव्हा मला अमरेशच्या या कृत्याची माहिती मिळाली, तेव्हा मी त्याला तात्काळ ताकीद दिली आणि पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली.”
हे प्रकरण वाढल्याचे लक्षात येताच कपराडा मतदारसंघाचे भाजप आमदार जितू चौधरी यांनी तात्काळ अमरेशशी संपर्क साधला. त्यांनी अत्यंत कडक शब्दांत अमरेशला फटकारले आणि असला मूर्खपणा पक्ष सहन करणार नाही, तात्काळ पाणी सुरू कर, असा दम भरला.
दोन दिवसांच्या छळानंतर अखेर लेखी माफीनामा
पाणी नसल्याने वैतागलेल्या गावकऱ्यांनी अखेर तालुका विकास अधिकारी आनंद पटेल यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली. त्यानंतर सरकारी यंत्रणा तातडीने हलली. गावाच्या तलाठ्याने तात्काळ घटनास्थळी जाऊन हस्तक्षेप केला. सरकारी दबावानंतर आरोपी भाजप कार्यकर्ता अमरेश बुधल याने आपली चूक मान्य केली असून प्रशासनाकडे लेखी माफीनामा दिला. दोन दिवसांच्या छळानंतर बोरवेलचे पाणी पुन्हा सुरू करण्यात आले.













